अकलूज एसटी आगारात लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहाने साजरी.

डाॅ. धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते विविध पुरस्कारांचे वितरण.
अकलूज (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अकलूज आगारात साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती जुन्या बस स्थानकात साजरी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, जनसेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील, अकलूज नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सौ. रेश्माताई आडगळे, अकलूज आगाराचे आगार व्यवस्थापक विकास पोपळे, अकौंटंट सावंत, माळेवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अरुण खंडागळे, नगरसेविका मनिषाताई तिकुटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
साहित्यरत्न डाॅ. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी तीन विशेष पुरस्कार डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते देण्यात आले. यामध्ये अकलूज नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष रेश्माताई अडगळे यांना राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. साहित्यिक व व्याख्याते चंद्रशेखर गायकवाड यांना साहित्यरत्न पुरस्कार देण्यात आला. श्रीमती विद्याताई साळुंखे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देण्यात आला. यावेळी अकलूज आगारातील कामगारांच्या गुणवंत मुलांचे चषक देऊन सन्मान करण्यात आला .
अध्यक्षीय भाषणात कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील म्हणाले, लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे एक जागतिक पातळीवरील साहित्यिक आहेत. जगातील अनेक भाषात त्यांचे साहित्य अनुवादित झालेली आहेत. त्यांची साहित्य युवा पिढीने वाचली पाहिजे. साहित्यिक व्याख्याते चंद्रशेखर गायकवाड बोलताना म्हणाले, साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे कमी शिकलेले असून सुद्धा त्यांनी ३५ कादंबऱ्या, १५ कथा संग्रह लिहिले, प्रवास वर्णने लोकनाट्य लिहिले. लालबावटा कला पथकाची स्थापना केली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये हातामध्ये डफ घेऊन संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. लोक जागृती निर्माण केली, गोवा मुक्ती आंदोलनामध्ये भाग घेतला. एवढेच नव्हे १९४२ मध्ये चले जाव आंदोलनांमध्ये ते सहभागी झाले होते. राशियामध्ये मॅक्झिम गार्किच जे कार्य आहे. अमेरिकेमध्ये पॉल रॉबसन यांनी गायनाच्या माध्यमातून क्रांती घडवली. दक्षिण आफ्रिकेमध्ये व वंशवादाचा राक्षस थैमान घालत होता. त्यावेळी कवितेच्या माध्यमातून त्यांनी क्रांती घडवली, अगदी तेच कार्य भारत देशामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केली आहे.

हातामध्ये डफ घेऊन शाहिरी आणि लोकनाट्य माध्यमातून देशात क्रांती केली. २७ नोव्हेंबर २०२२ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठा विद्यापीठाने त्यांना मरणोत्तर डिलीट ही पदवी बहाल केली. ती पदवी त्यांच्या सुनबाई सावित्रीबाई मधुकर साठे यांनी स्वीकारली. थोर शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या शुभहस्ते डिलीट पदवी देण्यात आली. केंद्र सरकारने अण्णाभाऊ साठे यांच्यावर टपाल तिकीट सुद्धा काढल आहे. २०२२ मध्ये रशियाच्या पुष्किन विद्यापीठात अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर चर्चासत्र आयोजित केले होते. अण्णाभाऊ साठे हे जागतिक पातळीवर एक महान साहित्यिक आहेत.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विद्या थोरात यांनी केले तर आभार अभिजीत वाघमारे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नितीन खंडागळे, आनंद कांबळे, चैतन्य मस्के, उमेश साठे, भारत साठे, रामचंद्र साठे, ज्ञानेश्वर गवळी, रेश्मा वाघमारे, भिसे यांनी विशेष परिश्रम घेतले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



