महाराष्ट्र शासनाच्या यशवंत पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामीण विकास योजना अंमलबजावणीमध्ये पंचायत समिती अक्कलकोट पुणे विभागात अव्वल
गटविकास अधिकारी सचिन खुडे यांचे सर्वत्र कौतुक
अक्कलकोट (बारामती झटका)
महाराष्ट्र शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या योजना विषयक कामगिरीच्या मूल्यमापनाकरिता व प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सन २००५-०६ पासून राज्यस्तर व विभाग स्तरावर यशवंत पंचायत राज अभियान ही पुरस्कार योजना सुरू केलेली आहे. पंचायत राज प्रशासन व विकास कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषदा व पंचायत समित्या यांनी सन २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये केलेल्या कामाचे मूल्यमापन विचारात घेऊन शासनाने राज्यस्तर व विभागस्तर अशा दोन स्तरावर ही अभिनव योजना सुरू केली आहे.
सदर अभियानाच्या अनुषंगाने शाश्वत विकास ध्येय अंतर्गत १७ उद्दिष्टे आणि ९ संकल्पना अंतर्गत पंचायत समितीला त्यांच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व विभागांच्या कामकाजा संबंधाने प्रश्नावली दिली गेली. यामध्ये केलेल्या कामाच्या अनुषंगाने प्रथम विभागस्तरीय समितीद्वारे पंचायत समिती अक्कलकोट कार्यालयाची तपासणी करण्यात आली.
सदरच्या विभाग स्तरीय समितीने राज्य शासन अहवाल सादर केला. त्यानंतर राज्यस्तरीय समितीने पंचायत समिती अक्कलकोट कार्यालयाचे मूल्यमापन केले. सदरच्या राज्यस्तरीय मूल्यमापनामध्ये पंचायत समिती अक्कलकोट कार्यालयाने एकूण ४०० पैकी ३६१ गुण प्राप्त करून पुणे विभागामध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने दि. १२ जून रोजी निर्गमित केला आहे. हे यश मिळवण्यामागे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच पंचायत समिती स्तरावरील सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्याने यशवंत पंचायत राज अभियानामध्ये पंचायत समिती अक्कलकोट यांना सर्वोत्कृष्ट कामगिरी करता आल्याची माहिती गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng