ज्येष्ठ नेते रघुनाथ अण्णा कवितके यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उत्तमराव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होणार संपन्न
नातेपुते (बारामती झटका)
नातेपुते ता. माळशिरस, येथील अहिल्यादेवी पतसंस्थेचे व अक्षय शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठनेते रघुनाथ आण्णा आत्माराम कवितके यांचा ७१ व्या वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार समारंभ अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उत्तमराव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तर सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली रविवार सकाळी ४ जून २०२३ रोजी सकाळी १० वा. कवितके सांस्कृतिक भवन, नातेपुते येथे संपन्न होत आहे. ज्येष्ठ नेते रघुनाथ आण्णा कविता यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रकांत घुगरदरे प्रशाला नातेपुते येथे सकाळी ८ वाजता वृक्षारोपण तर नातेपुते येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटपाचा कार्यक्रम सकाळी ९ वाजता होणार आहे. तसेच सकाळी १० वाजता सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, बचत गटातील महिलांचा सन्मान, गणेशोत्सव मंडळांचा सन्मान उद्योजकांचा सन्मान, स्पर्धा परीक्षा गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
कर्ममहर्षी रघुनाथ अण्णा कवितके उर्फ अण्णा हे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून नातेपुते परिसरात सुपरिचित आहेत. सन १९७३ साली अण्णांनी बी. कॉम. (ओनर्स) पदवी घेऊन शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर लगेचच अण्णांनी त्यांचे वडील व आजोबा यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थाने जीवनास सुरुवात केली. त्यात ते यशस्वीही झाले.एवढेच नव्हे तर त्यांनी आपले पितामह (आजोबा) यांच्या सर्व इच्छा पूर्ण करून त्याला मूर्त स्वरूप दिले. अण्णा जसे आदर्श नातू होते तसेच ते आदर्श बंधूही आहेत. अण्णांनी त्यांची रघुनाथ या नावाप्रमाणेच श्रीरामांची भूमिका आपल्या कुटुंबातील भावंडांप्रती यशस्वी केली आहे. ज्या भावाचे ज्या क्षेत्रात कौशल्य व आवड आहे त्यामध्ये त्या भावास परिपूर्ण व यशस्वी करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळे सुवर्ण व्यवसायामध्ये लक्ष्मणतात्या, कापड व्यवसायात राजारामभाऊ, डॉक्टर पेशामध्ये डॉक्टर विठ्ठलकाका, व शेतीमध्ये सतीशनाना हे सर्व आजही यशस्वी वाटचाल करत आहेत. त्यामुळे अण्णांची कुटुंबकर्ता ही भूमिका उक्तीप्रमाणे व कृतीप्रमाणे सार्थ ठरली आहे. म्हणूनच कुटुंबातील सर्वजण त्यांना धर्मराजाप्रमाणे मानून आचरण करतात व त्यांना गुरु मानतात.
सन १९९० साली अण्णांनी दिलीप शेठ घुगरदरे, कै. डॉ. नानासाहेब उराडे, कै. सुरेशदादा ठोंबरे यांच्या सहकाऱ्यांनी नातेपुते गावातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल पण होतकरू व गरजूंना व्यापार धंद्यात आर्थिक सभलता आणण्यासाठी अहिल्यादेवी नागरी बिगर शेती पतसंस्थेची सुरुवात केली त्यामुळे गरजूंची आर्थिक नड पूर्ण तर झालीच पण, गावाची बाजारपेठ उद्योग व्यवसायांनी समृद्ध झाली. तेव्हापासून ते आजअखेर ही संस्था सतत नफ्यात उत्तरोत्तर वाटचाल करत आहे. त्यानंतर त्यांनी मार्तंड देवस्थान विश्वस्त संस्था ही व्यापक व समृद्ध होण्यासाठी विश्वस्त संस्थेचे जागेत आत्माराम बापूराव कवितके सांस्कृतिक भवन आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स तयार करून या ट्रस्टला कायमचे उत्पन्नाचे साधन तयार केले. त्यानंतर पुढे अण्णांनी नातेपुते परिसरातील शैक्षणिक शाळांची आवश्यकता लक्षात घेऊन त्यांच्यावरील सहकाऱ्यांच्या साथीने अक्षय शिक्षण संस्था स्थापन केली. त्यामुळे या शाळेच्या माध्यमातून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण मिळू लागले. समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत अण्णांनी ही शिक्षणा गंगा निस्वार्थीपणे पोहचली आहे.
तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त ग्रामस्थ व सत्कार समिती नातेपुते यांच्यावतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng