विखे पाटील यांच्या पराभवास विखे पाटीलच जबाबदार

नगर (बारामती झटका)
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचा पराभव झाला. या पराभवाचा वस्तुनिष्ठ आढावा घेतला असता विखे पाटील यांच्या पराभवास विखे पाटीलच जबाबदार असल्याचा निष्कर्ष निघतो. २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत डॉ. सुजय विखे पाटील यांनी २,८१,४७४ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांनी मोठ्या जोमाने कामाला सुरुवात केली. त्यांच्या कामाचा झपाटा व आवाकाही त्यांच्या मताधिक्यासारखाच मोठा होता. नगर शहरातील रखडलेल्या उड्डाणपूलाचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली. दृश्य स्वरूपात नजरेत भरण्यासारख्या या कामासोबतच कल्याण-नांदेड-निर्मल २२२ (६१) या महामार्गासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. याशिवाय सार्वजनिक व वैयक्तिक लाभाच्या अनेक योजनाही त्यांनी मार्गी लावल्या. परंतु, हे करत असताना जनतेत आणि त्यांच्यात अंतर पडत गेले. दिवसेंदिवस ते इतके वाढत गेले की त्याचे पर्यवसान त्यांची आणि जनतेचे नाळ तुटण्यात झाले.
विखे पाटील यांच्या पराभवास विखे पाटीलच जबाबदार हे यासाठी म्हणावे लागेल की, त्यांनीच त्यांच्या संभाव्य प्रतिस्पर्ध्याला चर्चेत आणले. जनतेची मानसिकता काढण्याची वंशपरंपरागत अनुवंशिक देणगी व क्षमता असूनही विखे पाटील त्यांच्या संभाव्य प्रतिस्पर्ध्यावर सातत्याने टीका करून त्यांना त्यांच्या बरोबरीत आणले. याची ठळक सुरुवात विद्यमान खासदार निलेश लंके यांनी उभारलेल्या कोविड सेंटर पासून झाली. या कोविड सेंटरमध्ये निलेश लंके यांनी ज्या समर्पित भावनेने काम केले ते पाहता लोकांच्या नजरेत त्यांची प्रतिमा एक आदर्श समाजसेवक म्हणून साकारत गेली. त्याकडे दुर्लक्ष करून आपलं काम जनतेसमोर मांडण्याऐवजी विखे पाटील पिता-पुत्रांनी त्यातील वैगुण्य शोधून त्यावर टीका करण्यास सुरुवात केली. आपल्या प्रतिस्पर्ध्याला अनुल्लेखाने मारण्याचा मुत्सद्दीपणा रक्तात असूनही त्यांनी ते न करता त्यांच्या या योगदानावर हकनाक तोंड सुख घेतले. खऱ्या अर्थाने येथेच त्यांची मोठी चूक झाली. कारण, जेव्हा एखादा कार्य लोकोत्तर आहे अशी जनतेची धारणा होती तेव्हा, त्यावर टीका केलेली टीका जनतेच्या पचणी पडत नाही. जेव्हा एखाद्या रेषेचं अस्तित्व नगण्य करायचं असतं तेव्हा ती रेषा न पुसता तिच्या शेजारी तिच्यापेक्षा मोठी रेषा ओढायची असते, हा साधा व्यवहार विखे पाटील पिता पुत्रांच्या लक्षात कसा आला नाही हे न उलगडणारं कोडं आहे.

एकीकडे विखे पाटील पिता-पुत्रांनी उठवलेल्या टीकेला संधी समजून, हे हत्यार त्यांच्यावरच कसं पलटवायचे हे चाणक्य लंके यांनी बरोबर हेरले आणि त्या अनुषंगाने या लढतीला त्यांनी धनाढ्य विरुद्ध गरीब असं वळण दिलं. त्याला महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्यांची फोडणी देऊन वातावरण निर्मिती करण्यात लंके कमालीचे यशस्वी झाले. कारण, जनतेच्या मनातही याच समस्यांमुळे केंद्र सरकारवर प्रचंड राग होता. त्याचा परिणाम असा झाला की, लोकमतही त्यानुरूप लंकेंना अनुकूल बनत गेलं. याच लोकभावनेला लंके यांनी बेमालूमपणे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असं स्वरूप दिलं आणि लोकांनाही ते भावलं. याबरोबरच, डॉ. सुजय विखे पाटील हे जनतेचे नेते नसून साडेतीन लाभार्थी कार्यकर्त्यांचे नेते आहेत, असं नॅराटिव्ह सेट करण्यातही लंके यशस्वी ठरले. त्याला कारणेही तशीच होती. पाथर्डी तालुक्यात तर ती अधिक ठळकपणे जाणवत होती. डॉ. सुजय विखे पाटील कार्यकर्त्यांना सहज उपलब्ध होत नाहीत, ही लोकभावना दिवसेंदिवस घट्ट होत गेली. परिणामी पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांची सातत्याने पाठराखण करणाऱ्या पाथर्डी तालुक्यातील जनतेने डॉ. सुजय विखे पाटील यांना यावेळी म्हणावी अशी साथ दिली नाही. फलस्वरूप त्यांना पाथर्डी तालुक्यात मोठं मताधिक्य मिळालं नाही. याउलट शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात डॉ. सुजय विखे पाटील यांचे मताधिक्य रोखण्यात निलेश लंके यांना यश मिळालं.
आमचा, खा. सुजय विखे पाटील यांच्यावर राग नसून त्यांच्या भोवतीच्या कोंडाळ्यातील काही लाभार्थी कार्यकर्ते व त्यांच्या पाथर्डी तालुक्याचे काम पाहणाऱ्या स्विय सहाय्यकांवर राग आहे, असं लोक उघडपणे बोलताना आढळून येत होते. कारण, त्यांच्यामुळेच आपल्याला खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यापर्यंत पोहोचता येत नाही, अशी सर्वसामान्य जनतेची धारणा झाली होती व दिवसेंदिवस ती अधिकाधिक गडद होत गेली. खा. डॉ. सुजय विखे पाटील यांना मध गोळा करणाऱ्या मधमाश्याची गरज नसून मध गोळा करण्याचा गुणच नसलेल्या मोठमोठ्या गांधीलमाशांची गरज आहे-, ही जमिनीवर काम करणाऱ्या एका तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची भावना फारच बोलकी होती. अशातच मी तुमच्या विवाह सोहळ्यास व दशक्रिया विधींना हजर राहू शकणार नाही परंतु, तुमच्या विकास कामांसाठी तत्पर असेल-, या विधानाची खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडून वारंवार होणारी पुनरावृत्ती ही जनतेला खटकत होती. ती वास्तविक असली तरी जनतेच्या गळी उतरली नाही. याउलट केवळ फोनवरून दिलेल्या आमंत्रणाचा स्वीकार करून लंके लहान मोठया कार्यक्रमांना सातत्याने हजेरी लावत होते. परिणामी, जनतेच्या सुखदुःखाची जाणीव असणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण होत गेली. याचा फायदा त्यांना मोठ्या प्रमाणावर होत गेला व त्याचं फळही त्यांना मतदानाच्या स्वरूपात मिळालं.
गाव पातळीवर काम करणाऱ्या व प्रत्यक्ष जनाधार असलेल्या कार्यकर्त्यांऐवजी, प्रत्यक्षात जनाधार नसलेल्या व केवळ हांजी हांजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या यंत्रणेने दिलेलं विनाकारण महत्व व लाभही कामसू कार्यकर्त्यांच्या रोषाला कारणीभूत ठरला. परिणामी, दिव्याखाली अंधार दाटत गेला आणि त्याचा मोठा फटका खा. डॉ. सुजय विखे पाटील यांना हकनाक सोसावा लागला. याउलट, डॉ. विखे पाटील यांच्या तुलनेत अगदीच नगण्य रसद मिळूनही लंके यांच्या कार्यकर्त्यांनी जीव ओतून काम केलं आणि त्याचा फायदा त्यांना मिळाला.
लंके यांचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रचार करताना आढळत होते तर खा. डॉ. विखे पाटील यांचे कार्यकर्ते लोकांना फक्त जेवणावेळी देत फिरत होते. प्रत्येक गावात स्थानिक पातळीवर विरोधी गट असतात. त्यांचे मनोमिलन घडवून आणण्याऐवजी डॉ. विखे पाटील यांच्या यंत्रणेने कालच्या पुण्याईवर जोखलेल्या विशिष्ट गटांना जवळ केले. परिणामी, निलेश लंके यांना आपसूक कार्यकर्ते उपलब्ध होत गेल्याने प्रत्येक बुथवर त्यांची यंत्रणा उभी राहिली. या बारीक सारीक गोष्टींकडे डॉ. विखे पाटील यांनी जातीने लक्ष दिले असते तर राहुरी व शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात त्यांना परिणामकारक मताधिक्य मिळालं असतं. त्यांनी ते दिलं नाही म्हणूनच, विखे पाटील यांच्या पराभवास विखे पाटीलच जबाबदार ठरले का -, असा प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आणि साहजिकही आहे.