उस खोडवा व पाचट व्यवस्थापन – भाग – १ श्री. सतीश कचरे, मंडळ कृषि अधिकारी नातेपुते
नातेपुते (बारामती झटका)
ऊस हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे नगदी पीक आहे. महाराष्ट्राची आर्थिक, सामाजिक व शैक्षणीक प्रगती होण्यास खारीचा वाटा आहे. माळशिरस तालुक्याचा विचार करता ५ साखर कारखाने आहेत. अंदाजीत हंगामामध्ये ३० ते ३५ हजार हेक्टरवरील उसाचे गाळप केले जाते. यातील १०% क्षेत्रावर पाचट व्यवस्थापन केले जाते ते १००% पर्यंत वाढविणे गरजेचे आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होते व बरेच जोडधंदे व आर्थिक चलन फिरते. तालुक्यातील एकूण उसाखालील क्षेत्रापैकी ३५ ते ४०% क्षेत्रावर खोडवा पीक घेतले जाते व उत्पादनात २५ ते ३०% हिस्सा आहे. वाढलेले रासायनिक खत निविष्ठ व मंजूरीचे दर या हातातील नसलेल्या उत्पादनातील बाबींवर पर्याय शोधून खोडवा ऊस उत्पादन खर्च करणे हा एकमेव पर्याय आपणाकडे आहे. त्यासाठी खोडवा पीकातील पाचट व्यवस्थापन या बाबीचा प्रामुख्याने विचार करणे काळाची गरज आहे.

ऊसाचे पाचटात ०.५% नत्र ०.२% स्फुरद, ०.७ ते १% पालाश व ४०% सेंद्रीय कर्बचा एक काडी लावून पोतभर राख करण्यापेक्षा यांचे संवर्धन करून पिकास उपलब्ध करून देण्यासाठी मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव यांनी पाचट व्यवस्थापन पद्धती विकसित केली आहे. त्याचा वापर करणे गरज होऊन बसली आहे. आधूनिक प्रयोगाअंती सिद्ध निष्कर्षाआधारे त्यांनी पटवून दिले आहे. १ हेक्टर ऊस पिकातून ८ ते १० टन पाचट मिळते आणि त्याचे व्यवस्थापन केले तर त्यापासून ४० ते ५० किलो नत्र – २ युरिया पोती, २० ते ३० किलो स्फुरद – २ पोती, सिंगल सुपर फॉस्फेट, ७५ ते १०० किलो पालाश म्हणजे – २ पोती म्युरेट ऑफ पोटेश व ३ ते ४ हजार किलो सेंद्रीय कर्ब जमिनीत मिसळविण्यास मदत होते. व हेक्टरी पाचट व खोडवा व्यवस्थापन या पद्धतीने केले तर एकूण खर्चात ३५ ते ४० हजाराची बचत घेऊन इतर सर्व फायद्यासह १० ते १५ उत्पादनात वाढ होते. तालुका मंडळ मधील जमिनीला सेंद्रीय कर्ब प्रमाण ०.५ पर्यंत खाली आले आहे व सतत घेण्यात येणाऱ्या पीकांमुळे जमिनिची जैविक, भौतीक, रासायनिक गुणधर्म बिघडले आहेत. आपल्या वारसांना जर जमिन पिकाऊ उत्पादन क्षम सोपविण्याची असेल तर या बाबींकडे लक्ष देणे नित्य गरजेचे आहे. उपलब्ध माहितीच्या आधारे ३५ ते ४०% खोडवा पिक क्षेत्रापैकी सर्वसाधारणपणे १०% क्षेत्रावर पाचट व्यवस्थापन केले जाते. यामागचे कारण म्हणजे मशागत अडचणी, आंतरपिक घेता येत नाही, तणाचा बंदोबस्त हे गैरसमज आहेत. परंतू मध्यवर्ती ऊस संशोधन शास्त्रज्ञ यांनी हे गैरसमज दूर केले आहेत.


१५ फेब्रुवारी पर्यंत तोडलेल्या आडसाली पूर्वहंगामी व सुरु ऊसाचा खोडवा ठेवता येतो व त्याचे व्यवस्थापन खालील प्रमाणे करावे. ऊस तोडणी झाल्यानंतर पाचट कुट्टी, ऊस पाचट मल्चरचे सहाय्याने एकरी २६०० रुपये ३००० रुपये दराने ट्रॅक्टर चालीत यंत्राच्या सहाय्याने पाचट कुट्टी करून घ्यावी. जर ऊस तोडणी ऊस हार्वेस्टरने झाली असेल तर उस तोडणी बरोबर पाचट कुटीही होते व तोडणी मनुष्य बळाने केली असेल तर ही यंत्रे राज्य पुरस्कृत यांत्रीकरण अभियान, राष्ट्रीय कृषि विकास यांत्रीकरण अभियान, कृषि यांत्रीकीकरण उपअभियान अंतर्गत ४० ते ५०% अनुदानावर उपलब्ध आहेत. याचा वापर करून पाचट कुट्टी व पाचट मल्चर करून घ्यावे. तदनंतर एकरी १ मजूराकडून वर – खाली तुटलेली ऊस खोडे जमिनीलगत तोडून घ्यावीत. व बुरशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ०१% बीवीस्टीन फवारणी करावी यानंतर प्रति हेक्टर ८० किलो युरिया, १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट टाकावे. तदनंतर ४०० लिटर पाणी + ५ किलो गुळ + ५० मिली निळ + १० किलो कंपोस्ट कल्चर / पाचट कुजविणारे जीवाणूचे द्रावण स्प्रिकरलचे किंवा मनुष्याच्या सहाय्याने पाचटावर फवारणी करावे. फवारणी की द्वावण शिंपडलेनंतर मजुरांच्या साहाय्याने पाचट सरीत दाबून घ्यावे व तदनंतर बैलाचे साहाय्याने किंवा पॉवटर टिलरने फोडून पाचटावर माती टाकावी. पाचटाचा मातीचा संबंध आल्याने पाचट कुजण्यास मदत होते. पाचट व्यवस्थामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी घेतो, ओलावा टिकून राहतो, तणाचा प्रादुर्भाव कमी होतो, जमिनीची जलधारण शक्ती वाढ होते, नैसर्गिक गांडूळ वाढ होते, सेंद्रीय पदार्थ विघटनामुळे मुख्य, दुय्यम, सुक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्धता वाढते, जमिनीचे तापमान कमी घेऊन सुक्ष्म वातावरण निर्मिती होते, सेंद्रीय कर्ब विघटनामुळे हवेतील कार्बन डायऑक्साइड जे पीकास अन्न तयार करण्यास उपयुक्त आहे, त्यांचे प्रमाण ३०० पीपीएम पेक्षा वाढते, आंतरपीके घेता येतात, पारंपारिक २३ ते २४ पाण्याचे पाळीचे प्रमाण कमी घेऊन १२ ते १३ पाणी पाळ्यात पीक काढणीस येते व जमिनिचा सामू ०.०८% ने कमी होण्यास, नत्र ६ किलो प्रति हेक्टर, स्फुरद – ९ किलो प्रति हेक्टर वाढ होऊन जमिनिची विद्युत वाहकता ०.०५ ने वाढते. सेंद्रीय कर्ब ०४ वाढ होते, जमिनिची घनता ०.०३ ग्रॅम/सेंमी ने कमी घेऊन जमिनीचे रासायनिक गुणधर्म सुधारणा होते. या सर्वांचे दृष्य अनुकुल परिणाम यामुळे खर्चात बचत होते व जमिनीचे गुणधर्म सुधारण्यासह राष्ट्रीय संपत्तीची बचत होऊन, खर्चातील एकरी १३ ते १४ बचतीसह १० ते १५% उत्पादनात वाढ होते.

तरी या सर्व बाबींचा फायदयाचा विचार करता खर्च बचतसह उत्पादन वाढीसाठी शेतकरी बंधूनी खोडवा पिकासाठी १००% पाचट व्यवस्थापन करण्याचे आवाहन नातेपुते मंडळ कृषि अधिकारी कार्यालयाने केले आहे व अधिकच्या माहितीसाठी नजीकच्या कृषि विभाग कार्यालय अधिकारी यांच्याशी संर्पक करण्याची विनंती केली आहे.


नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng