मंगळवेढ्यात शेतकऱ्यांच्या बंधुत्वाची अनोखी गाथा
बांधावरून तंटे होण्याची न भीती न भावना, ३८ हजार हेक्टर शेत जमिनीला बांधच नाही
बांधावरून कधीच भांडणे न होणारे राज्यातील एकमेव गाव
मंगळवेढा (बारामती झटका)
शेतीच्या बांधावरून होणारी भांडणे म्हणजे पिढ्यानपिढ्यांचे शत्रुत्व. हे तंटे कधी इतके विकोपाला जातात की एखाद्याचा जीव यात जातो. यावरून कोर्टकचेऱ्या करता करता अनेकांचे आयुष्य निघून जाते. पण एखाद्या गावात हजारो हेक्टर शेत जमिनीला असे बांधत नसतील तर, आश्चर्य वाटले ना ? अशी बांध नसलेली ३८ हजार हेक्टर शेतजमिन मंगळवेढा शिवारात पहायला मिळते. मंगळवेढा भागात शेतीला बांध न घालण्याची ही शेकडो वर्षाची परंपरा आहे. हद्दीबद्दल आक्षेप असला तरी तो लगेच आपसांत सामोपचाराने मिटवला जातो.
१२ किलो मिटर पर्यंत अशीच शेती
मंगळवेढा म्हणजेच ज्वारीचे कोठार. शिवेलगत शेतात कुठेही बांध दिसत नाहीत. मंगळवेढा-सोलापूर रोड लगत शेताच्या चारही दिशांना १२ किलोमीटर पर्यंत शेतात बांधच नाहीत. हे क्षेत्र ३८ हजार हेक्टर आहे.
सुपीक जमीन, तशी माणसेही समजदार
या परिसरातील जमीन सुपीक व सपाट आहे. ४० फुटांपर्यंत काळी माती असल्याने जमिनीचा पोत बदलत नाही. पावसामुळे या मातीत बांध टिकत नाहीत. मग शेतकरी शिव किंवा हद्द ओळखू यावी म्हणून फक्त एक फुटाचा दगड उभा करतात किंवा एखादे झाड लावतात.

एकमेकांना समजून घेत शेती
बांधावरून भांडणे झाल्याचे आपण अनेकदा ऐकतो. यातून एखाद्यावेळी जीवही जातात. पण, आमच्या मंगळवेढ्यात शेतकरी एकमेकांना समजून घेत मार्ग काढतात. बांधावरून भांडणाचे प्रकार होतच नाहीत – ज्ञानोबा फुगारे, निवृत्त शिक्षक व शेतकरी
- सर्वत्र कोरडवाहू जमीन कुठेही विहीर नाही
- पावसाच्या पाण्यावरच संपूर्ण शेती अवलंबून
- प्रमुख पीक ज्वारी, करडई व हरभरा
- वर्षातून साधारणपणे एकच पीक घेतले जाते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng