माझ्या राज्यात अस्पृश्य हा शब्दचं असता कामा नये

अकलूज (बारामती झटका)
मराठा साम्राजाच्या कोल्हापूर संस्थानातील छत्रपती शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ मध्ये कोल्हापुरातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांच्या आईचे नाव राधाबाई तर वडिलांचे नाव जयसिंगराव असे होते. कोल्हापूर संस्थानातील चौथे शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ मध्ये जयसिंगराव व राधाबाई यांचे पुत्र यशवंत यांना दत्तक घेतले व त्यांचे शाहू असे नाव ठेवले.
त्यानंतर शाहू महाराजांनी धारवाड़, राजकोट येथे शैक्षणिक व शारीरिक शिक्षण घेतले. राजकोट येथे राजे महाराजे यांच्या मुलांना शिक्षण देत असलेल्या संस्थेमध्ये त्यांच्यावरती राज्यसंस्कार झाले. माता आनंदीबाई यांनी त्यांना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज तसेच इतर महान व्यक्तींच्या पराक्रमाचा वारसा सांगितला व छत्रपती घराण्याची परंपरा ज्ञात करून दिली. लहानपणापासून शाहू महाराज चाणक्य होते. समाजातील लहानशा गोष्टीत त्यांचे नेहमी लक्ष असायचे. अभ्यासातही ते प्रचंड हुशार होते, राजकोटच्या राजकुमार कॉलेजमधील शिक्षणामुळे, प्रवासामुळे शाहू महाराज प्रचंड व्यवहारज्ञानी बनले होते. यातूनच त्यांचं व्यक्तीमत्व अधिकच खुलले होते.
राजकोट येथे शिक्षण चालू, असतानाच त्यांचा विवाह बडोद्यातील गुणाजीराव खानविलकर यांची कन्या लक्ष्मीबाई यांच्याशी दि. १ एप्रिल १८९१ रोजी झाला. पुढे २ एप्रिल १८९४ मध्ये त्यांचा राज्याभिषेक म्हणजे राज्यारोहण समारंभ झाला.
राज्याभिषेकानंतर शाहू महाराजांनी स्वराज्याचा दौरा केला, रयतेने गावागावांत छत्रपतींचे स्वागत केले. महाराजांना रयतेच्या प्रश्नांची जाण होतीच, पण राज्याभिषेकानंतर ते प्रश्न अधिक संवेदनशीलतेने जाणून ते सोडविण्याचा प्रयत्न केला.
शाहू महाराजांच्या कारकिर्दीचा तो काळ म्हणजे स्वातंत्र्या पूर्वीचा ५० ते ६० वर्षांपूर्वीचा काळ होता. त्याकाळची समाजिक परिस्थिती भीषण होती, पेशव्यांच्या काळात पेरले गेलेल्या जातीयतेच्या भिंती अधिक मजबूत होत्या. अस्पृश्य मागासवर्गीय लोकांना, स्वतःला उच्च वर्णीय समजणारे धर्मांध लोक अतिशय तुच्छतेने वागवत असत. त्यांना सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्यासही बंदी होती. अस्पृश्यांना राहायला गावकुसाबाहेर जागा होत्या. त्यांना गावात राहायची परवानगी नहती. त्यांच्याकडे कुणी जेवण सोडा पाणीही पीत नसे, त्यांचा स्पर्श सुद्धा अशुभ मानला जायचा. असली भीषण सामाजिक परिस्थिती पाहुन शाहू महाराज व्यथित झाले. स्वराज्यातील याच कष्टकरी, श्रमकारी, शेतकरी व बहुजन वर्गाचे दुःख निवारण्यासाठी आपले आयुष्य खर्ची करण्याचा संकल्प छत्रपती शाहू महाराजांनी त्याकाळी केला. सनातन्यांनी, कर्मठाणी हिनवलेल्या गरीब अस्पृश्य लोकांना छत्रपतींनी आपलसं करायला सुरुवात केली.
माझ्या राज्यात अस्पृश्य हा शब्दच असता कामा नये, असं म्हणत त्यांनी समाज सुधारणेचा पाया रचायला सुरुवात केली.
जातीयता नष्ट व्हाही यासाठी ते मुद्दामहून अस्पृश्यांच्या घरी जाऊ लागले. त्यांच्याबरोबर जेवण करू लागले. एवढेच नाही तर छत्रपतींनी त्यांच्या एका स्नेहभोजनाचा कार्यक्रमही ठेवला होता व स्वतः शाहू महाराजांनी त्यांच्याबरोबर जेवण केलं होतं. बहिष्कृतांना समाज पुरस्कृत करण्यासाठी उचललेलं हे ऐतिहासिक पाऊन होतं. पेशवाईच्या काळात फोफावलेल्या जातीयतेवर शाहूंनी प्रहार केला होता.
माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून देण्यासाठी शाहू महाराज अहोरात्र कष्टत होते. शाहू महाराज हे फक्त बोलके सुधारक नव्हते ते कृतिशील सुधारक होते.
त्याकाळी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या गंगाराम कांबळे नावाच्या व्यक्तीला त्यांनी कोल्हापूरमध्ये चहाचे हटिल सुरु करून दिले होते. डोक्यात जातीयतेची हवा गेलेली माणसं इथं चहा पिणार नाहीत, अशी शंका महाराजांना आली म्हणून या हॉटेलला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी शाहू महाराज रोज सकाळी आपल्या सहकार्यांबरोबर इथं चहा पिण्यासाठी येऊ लागले. आपले महाराज या होटेलमध्ये चहा पीत आहेत, हे पाहिल्यानंतर सामान्य लोक सुद्धा या हॉटेलमध्ये येऊ लागले. अशाप्रकारे लोक जातपात विसरून एकमेकांच्या सुखदुःखात एकत्र येऊ लागले.
सनातनी वर्ण व्यवस्थेने अनेक जातींना उपेक्षित ठेवून त्यांचा शिक्षणाचा, सत्तेचा अधिकार नाकारला होता. सामाजिक अवहेलना झाल्यामुळे अशा कित्येक जाती प्रवाहाच्या बाहेर फेकल्या गेल्या होत्या, काही कुटुंबांनी गुलामगिरी स्वीकारली होती. पोटासाठी गुलामगिरीत धन्यता मानून कित्येत जाती फक्त जगत होत्या. दोन वेळच्या अन्नासाठी कुटुंब चालविण्यासाठी हाताला काम मिळत नसल्याने इतर काही जमाती चोर्या, दरोडे टाकत असत, त्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांना दुनीगार म्हणून घोषित केलं होतं. यामध्ये प्रामुख्याने रामोशी, पारधी समाज होता. त्यांच्यावर गुन्हेगारीचा शिक्का मारण्यात आला होता. आपल्या राज्यात समता प्रस्थापित व्हावी यासाठी शाहू महाराजांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली व आपली कारकीर्द पणाला लावून गुन्हेगार ठरवलेल्या या जातीवरचे निर्बंध उठकले. त्यांची हजेरी पद्धत बंद केली. त्यांना सैन्याचे प्रशिक्षण देऊन आपल्या संस्थानामध्ये रखवालदाराच्या नोक-या दिल्या. गुन्हेगार ठरवले गेलेल्या समाजाला गुन्हेगारीपासून परावृत्त करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून सामाजिक बांधिलकी जपणारे शाहू महाराज हे मानवतावादी राजे होऊन गेले.
एवढंच नाही तर काही इतर विशिष्ट जाती पोटासाठी गावोगावी भटकंती करून जगत असतं. एका गावातून दुसऱ्या गावात जाऊन पालं टाकून राहत असतं आणि हाताला मिळेल ते काम करून ती माणसं आयष्यभर भटकंतीचं जगणं जगत होती. अशा लोकांना शाहू महाराजांनी संस्थानामध्ये जागा देऊन पक्की घरं बांधून दिली व कुटुंबातील सदस्यांना संस्थानामध्ये नोकर्या देऊन त्यांच्या रोजगाराची सोय केली. त्यामुळे पोटासाठी गावोगावी वनवन भटकणाऱ्या लोकांना समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली.
महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाचा वारसा समर्थपणे पुढे चालवण्याचे काम शाहू महाराज करीत होते. सामाजिक परिवर्तनाचे काम करणाऱ्या छत्रपतींना सुद्धा उच्च वर्णीयांच्या टीकेला सामोरे जावे लागत होते. एवढी मक्रम वर्णव्यवस्था जातीव्यवस्था सनातन्यांनी निर्माण केली होती. पण शाहू महाराज हे छत्रपतींच्या विचारांचे वारसदार होते ते त्यांच्या कार्यापासून यतकिंचितही विचलित झाले नाहीत. उलट वेदोक्त प्रकरणावरून त्यांनी सनातनी व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारले होते.
सामाजिक मागासलेल्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर त्यांना संस्थांनातील नौकर्याबरोबर त्यांच्या भविष्यातील पिढीसाठी दीर्घकालीन उपाययोजना गरजेची होती. त्यासाठी सतीचे शिक्षण आणि आरक्षण दिल्यास समाजातील दरी मिटण्यास मदत होईल, अशी शाहू महाराजांची खात्री होती. म्हणून त्यांनी राज्यात शिक्षणाचा प्रसार केला, कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. त्यावेळी प्राथमिक शिक्षण सर्वांसाठी सक्तीचे करणारे देशातले एकमेव राजे होते शाहू छत्रपती. त्यांनी गावागावात शाळा काढल्या विविध ठिकाणी शैक्षणिक, संस्था उभारल्या.
जे पालक मुला-मुलींना शाळेत पाठविणार नाहीत त्यांच्या कडून दंड आकारण्याचे आदेश दिले. बहुजनांनी समाजात सम्मानाने जगण्यासाठी शिक्षणाची कास धरुण स्वावलंबी बनविले. मग स्थावलंबी बनलेली मस्तक कुणापुढे नतमस्तक होऊन गुलामगिरी करणार नाहीत अशा प्रकारचा स्वाभिमान प्रजाजनामध्ये निर्माण करण्यात शाहु महाराज यशस्वी झाले होते. पण त्याकाळी दोन वेळच्या अन्नाचा प्रश्न समोर असलेल्या बहुजनांना आपल्या मुलांना शिक्षणासाठी बाहेर पाठवून खर्च करणे शक्य नव्हते. याची जाण शाहू महाराजांना होती. त्यासाठी त्यांनी विविध जाती धर्मातील मुलांसाठी बोर्डिंग उभारली. मराठा बोर्डिंग, जैन बोर्डिंग, दलित बोर्डिंग, लिंगायत बोर्डिंग, अशा अनेक बोर्डिंगची स्थापना त्यांनी कोल्हापुरात केली. शाहू महाराजांनी कोल्हापूर, नागपूर, पुणे, नाशिक, चेन्नई इत्यादी ठिकाणी शैक्षणिक संस्था उभारण्यासाठी पुढाकार घेतला.
प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाहू महाराजांना आदर वाटत असे. म्हणूनच त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी सर्वोतपरी मदत केली.
विक्रमसिंह मगर
मो. १९७८००२७०७० मु. पो. अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा