माळशिरस येथे क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन…
माळशिरस (बारामती झटका)
क्रांतीसुर्य, आद्य समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे जनक, सत्यशोधक, महात्मा जोतीराव गोविंदराव फुले शब्दांकन व संकलन – श्री सतीश कचरे
जन्म – एप्रिल ११, इ.स. १८२७
कटगुण, सातारा,महाराष्ट्र
मृत्यू – नोव्हेंबर २८, इ.स. १८९०
पुणे, महाराष्ट्र
वडील – गोविंदराव फुले
आई – चिमणाबाई गोविंदराव फुले .
पत्नी – सावित्रीबाई फुले
महात्मा जोतीबा फुले (एप्रिल ११, इ.स. १८२७ – नोव्हेंबर २८, इ.स. १८९०) हे मराठी लेखक, विचारवंत, समाजसुधारक, संपादक समाज परिवर्तक यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी केलेल्या कामाचा लेखा जोखा !!
जोतीबा फुले यांचे मूळ गाव – कटगुण (जि. सातारा) होते. गोऱ्हे हे त्यांचे मूळ आडनाव. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला. तेथे त्यांचे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले व होले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत. जोतीबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. महात्मा फुल्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी ११ एप्रिल १८२७ साली झाला. वडिलांचा फुले विक्रीचा व्यवसाय त्यामुळे फुले म्हणून ते ओळखण्यात येऊ लागले. व तेच नाव पुढे रूढ झाले. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. १८४२ ला माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला.
सप्टेंबर २३, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पुरोहितांकडून होणाऱ्या अन्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून तथाकथित शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. ‘सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥’ हे समाजाचे घोष वाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्या त्यांच्या कवितेच्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत. –
“विद्येविना मती गेली।
मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली।
गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका
अविद्येने केले।।”
जोतीरावांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत. १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी पुण्याच्या वेताळपेठेत १८५२ मध्ये त्यांनी शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. समाज सुधारण्याच्या कार्याला गती देण्यासाठी व व्यापक करण्यासाठी १८७३ साली त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. ‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची (अस्तिक्यवादी) विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या ‘शेतकर्याचा आसूड’ या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्रयाची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणून ही जोतीरावांचे दर्शन होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे जोतीराव एक तत्वचितक व्यत्तिमत्त्व म्हणूनही आपल्यासमोर येतात.
👉इ.स. १८२७ – जन्म कटगुण, सातारा जिल्हा
👉इ.स. १८३४ ते १८३८ – पंतोजींच्या शाळेत शिक्षण झाले.
👉इ.स. १८४० – सावित्रीबाईंशी विवाह.
👉इ.स. १८४१ ते १८४७ – स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये इंग्रजी शिक्षण घेतले.
👉इ.स. १८४७- लहुजी वस्ताद साळवे दांडपट्टा व इतर शारीरिक शिक्षण घेतले.
👉इ.स. १८४७ – थॉमस पेन यांच्या ‘राईट ऑफ मॅन’ या ग्रंथाचा अभ्यास.
👉इ.स. १८४८ – मित्राच्या विवाहप्रसंगी निघालेल्या मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून अपमान झाला.
👉इ.स. १८४८ – भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले.
👉सप्टेंबर ७, इ.स. १८५१ – भिडे वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात.
👉इ.स. १८५२ – पूना लायब्ररीची स्थापना.
👉मार्च १५, इ.स. १८५२ – वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.
👉नोहेंबर १६, इ.स. १८५२ – मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार.
👉इ.स. १८५३ – ‘दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग ॲन्ड अदर्स’ स्थापन केली.
👉इ.स. १८५४ – स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी👉इ.स. १८५५ – रात्रशाळेची सुरुवात केली.
👉इ.स. १८५६ – जोतीबांवर मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न झाला.
👉इ.स. १८५८ – शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.
👉इ.स. १८६० – विधवाविवाहास साहाय्य केले.
👉इ.स. १८६३ – बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली .
👉इ.स. १८६५ – विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.
इ.स. १८६४ – गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला.
👉इ.स. १८६८ – दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.
👉इ.स. १८७३ – सत्यशोधक समाजची स्थापना केली.
👉इ.स. १८७५ – शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर).
👉इ.स. १८७५- स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले.
👉इ.स. १८७६ ते १८८२ – पुणे नगर पालिकेचे सदस्य होते.
👉इ.स. १८८० – दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला.
👉इ.स. १८८० – नारायण मेघाजी लोखंडे यांना ‘मिलहॅण्ड असोसिएशन’ या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत साहाय्य केले.
👉इ.स. १८८२ – ‘विल्यम हंटर शिक्षण आयोगा’ समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली.
👉इ.स. १८८७ – सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व नवीन पूजाविधीची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली.
👉इ.स. १८८८- ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार.
रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज समाधी जिणोद्वार केला व पहिली शिवजयंती व पहिला पोवाडा महात्मा फुले यांनी केला. भारतील सर्वात मोठे कॉन्ट्रॅक्टदार म्हणून ख्याती होती. शिक्षण व समता या दोन शब्दात त्याचे समाजीक कार्याची संपूर्ण जगाला ओळख करून दिली. अस्पृश्य समाज हा राजकीय समाजीक शैक्षणीक आर्थिक हक्क व प्रवाहापासून वंचीत होता. त्यांना समाजाच्या मुळ प्रवाहात आणून त्यांच्यासाठी पिण्याचे पाण्याचा हौद खुला केला. गुलामगिरी, ब्राम्हणाचे कसब या ग्रंथातून जातीय व्यवस्थावर प्रहार केला. इ.स. १८८८ मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर वडेकर यांच्या हस्ते सत्कार करून ‘महात्मा’ ही पदवी प्रदान केली. २८ नोव्हेंबर, इ.स. १८९० – पुणे येथे निधन झाले. विद्याध्यायानासाठी ज्यांचा सतत असे प्रयास, त्यांचे अखंड जीवन म्हणजे, जणू एक खडतर प्रवास.
परि स्त्री शिक्षण;
हा एकची असे ध्यास,
हा एकची असे ध्यास,
या उक्तीप्रमाणे महात्मा ज्योतीराव फुले यांनी आपले व्यक्तिमत्व स्वयंप्रेरणेने व स्वतःच्या प्रयत्नांनी घडविले होते. त्यांचा पिंड हा कृतीशील क्रांतिकारकाचा होता. महाराष्ट्राच्या समाजसेवेसाठी ध्येयाने भरून जाऊन आपले सर्व जीवन समर्पित करणारे ते थोर पुरुष होते. आधुनिक भारतातले पहिले समाजक्रांतिकारक म्हणून त्यांना ओळखले जात असत. कारण ते सामान्य असले तरी विचाराने व कर्तुत्वाने असामान्य होते. सामाजिक विषमतेविरुद्ध ज्योतीबांनी बंड पुकारले. ‘शिक्षण व समता’ या दोन शब्दातच त्यांच्या या कार्याचे यथोचित वर्णन करता येईल. सर्वसामान्यांसाठी झटणारे ते सेवक होते. महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, समानता आणि सत्यासाठी देह झिजवणारे. बहुजनांचे उद्धारक, सत्यशोधक समाजाचे संस्थापक व थोर विचारवंत क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng