माळशिरस येथे झाड गोठ्यावर पडून तीन जनावरे दगावली, तर चाप कटर व पिठाची चक्की जमीनदोस्त झाली…
अवकाळी पावसात निसर्गाच्या वादळी वाऱ्याचे थैमान, सावली दिलेल्या झाडानेच जनावरांचा शेवट केला..
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस कोंडबावी रोड येथील शिवाजी विठ्ठल सरगर यांच्या गोठ्याच्या समोरील असलेले झाड अवकाळी पाऊस व जोराचा वारा यामुळे उन्मळून गोठ्यावर पडले. गोठ्यामध्ये असणारी तीन जनावरे दगावली आहेत. त्यामध्ये एक म्हैस व दोन गाईंचा समावेश आहे. गोठ्यामधील चाप कटर व पिठाची चक्कीसुद्धा जमीनदोस्त झालेली आहे. झाडाने उन्हाळ्यामध्ये जनावरांना सावली दिलेली असेल मात्र अवकाळी पाऊस व वाऱ्यात झाड कोलमडून जनावरांचा घात झालेला आहे.


शनिवारी अवकाळी पावसाने पुन्हा धुमाकूळ घातलेला आहे. माळशिरस तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस व वाऱ्याचा तडाखा बसलेला आहे. इस्लामपूर येथे झाडावर वीज पडून जीवित व वित्तहानी टळलेली आहे.


माळशिरस कोंडबावी रोड येथील शिवाजी विठ्ठल सरगर यांना मात्र अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसलेला आहे. गरीब परिस्थितीत दुग्ध व्यवसाय करून उपजीविका सुरू असणारे सरगर परिवार यांच्यावर निसर्गाने घाला घातलेला आहे. दुभती म्हैस व दोन गाई मरण पावलेल्या आहेत. झाड गोठ्यावर कोसळले असल्याने संपूर्ण गोठा जनावरांच्या अंगावर पडलेला असल्याने पत्रा व अँगल यामुळे जनावरे दगावली आहेत. गोठ्यामधील चाप कटर व पिठाची चक्कीसुद्धा जमीनदोस्त झालेली आहे. कोरोना परिस्थितीतून शेतकरी सावरत असताना निसर्गाच्या अवकृपेमुळे गरीब शेतकऱ्याला भुर्दंड बसलेला आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून गरीब शेतकऱ्याला आर्थिक मदत करण्याची गरज आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

