ताज्या बातम्यासामाजिक

आषाढी यात्रा कालावधीत मंदिर समितीने भाविकांच्या सुलभ दर्शनाला प्राधान्य द्यावे – पालकमंत्री जयकुमार गोरे

शासकीय महापुजेवेळी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे मुखदर्शन राहणार सुरु

पंढरपूर (बारामती झटका)

आषाढी शुद्ध एकादशी सोहळा ६ जुलै २०२५ रोजी असून, आषाढी यात्रा सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिर समितीने आवश्यक सुविधा पुरविण्याबरोबरच सुलभ व सुखकर दर्शन व्हावे, यासाठी आवश्यक नियोजन करावे. तसेच आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा सूरू असतानाही भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन व्हावे यासाठी आषाढी एकादशीच्या शासकीय महापुजा कालावधीत श्रींचे मुखदर्शन सुरू ठेवावे, अशा सूचना ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली आषाढी एकादशी वारी यात्रा पूर्व नियोजनाबाबत मंदिर समितीची श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास, पंढरपूर येथे बैठक आयोजित करण्यात आली होते.

या बैठकीस आमदार समाधान आवताडे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, श्री सेवागिरी महाराज देवस्थान पुसेगाव मठाधिपती परमपूज्य सुंदरगिरी महाराज, जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, मंदिर समितीचे सदस्य शकुंतला नडगिरे, ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, डॉ. दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे, प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, कार्यकारी अभियंता श्रीनिवास गुजरे, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, वास्तु विशारद श्रीमती तेजस्विनी आफळे, लेखाधिकारी मुकेश अनेचा, किसान मोर्चा प्रदेश सचिव माऊलीभाऊ हळणवर, तसेच ऑनलाईनद्वारे मंदिर समितीचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शासकीय महापूजेच्या वेळी मुखदर्शन व्यवस्था सुरू ठेवावी तसेच शासकीय महापूजा संपताच तात्काळ रांगेतील भाविकांची दर्शन व्यवस्था पूर्ववत करावी. शासकीय महापुजेवेळी मंदिरात गर्दी होणार नाही याची दक्षता घेऊन महापूजेला उपस्थितांची संख्या मर्यादित राहील याची दक्षता घेवून, शासकीय महापूजा विधीवत व परंपरेने पार पाडण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. भाविकांना जलद दर्शन व्हावे यासाठी व्हिआयपी दर्शन व्यवस्थेवर निर्बंध आणावेत. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धनाचे काम सुरू आहे त्या कामामुळे विद्युत वाहक केबल अस्ताव्यस्त झाल्या असून त्या केबल २४ जून पर्यंत पूर्ववत कराव्यात तसेच यात्रा कालावधीत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिरात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी सद्यस्थितीत सुरू असलेले काम थांबवून सदर ठिकाणची स्वच्छता करावी.

या कालावधीत नामदेव पायरी येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. गर्दीमुळे कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. दर्शन रांगेतील स्काय व तात्पुरते उड्डाण पूलांची पाहणी करून ते तांत्रिकदृष्ट्या योग्य आहेत का याची तपासणी करावी. तसेच मंदिर व मंदिर परिसरातील इलेक्ट्रिक ऑडिट, फायर ऑडिट करण्यात यावे अशा सूचना पालकमंत्री श्री. गोरे यांनी यावेळी दिल्या.

यावेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले, भाविकांना श्रींचे जलद दर्शन व्हावे तसेच दर्शन रांग जलद गतीने चालावी त्याचबरोबर घुसखोरी रोखण्यासाठी ज्यादा सुरक्षा रक्षकांची नियुक्ती मंदिर समितीकडून करण्यात येणार आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी समितीच्या वतीने विमा उतरविण्यात येणार आहे. दर्शन रांग, दर्शन मंडप, मंदिर परिसर या ठिकाणची वेळोवेळी स्वच्छता करण्यात येणार असून, दर्शन रांगेतील भाविकांना मोफत चहा, नाष्टा जेवण देण्यात येणार असल्याचे सांगितले.

तसेच मंदिर समितीकडून दर्शन रांगेत बॅरिकेटिंग, मॅट टाकणे, बसण्याची सुविधा, शुद्ध पिण्याचे पाणी, कुलर, स्वच्छता गृह, विश्रांती कक्ष, लाईव्ह दर्शन व्यवस्था, सार्वजनिक सूचना प्रणाली आदी व्यवस्था उपलब्ध राहणार आहेत. वारकरी भाविकांच्या सुरक्षेसाठी १२६ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत राहणार आहेत. तसेच तसेच चंद्रभागा वाळवंट येथे महिला भाविकांच्या सोयीसाठी चेंजिंग रूम व दर्शन रांगेत हिरकणी कक्ष उभारण्यात येणार असल्याचे यावेळी कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button