राजमाता अहिल्याबाई यांच्या जयंतीदिनी सत्यशोधक ढोक यांचा सन्मान संपन्न !!!

सत्यशोधक पध्दतीने विवाह करून गावचे पाणलिंग हायस्कूलसाठी मदत करावी – सत्यशोधक ढोक
वावरहिरे (माण) (बारामती झटका)
राजमाता अहिल्यादेवी युवा मंच, वावरहिरे आणि ग्रामस्थ यांनी लोकमाता अहिल्याराणी होळकर यांच्या २९९ वी जयंती दिनी महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले चरित्र साधने व प्रकाशन समिती, मुंबई वरती निवड झाल्याबद्दल व सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी आजपर्यंत देशभरात सत्यशोधक पद्धतीने मोफत विवाह तसेच फुले दांपत्य यांचे कार्य आणि त्यांचे जीवनावर विविध पुस्तके प्रकाशित केले म्हणून त्यांचा व इ. १० वी, १२ वी आणि विशेष कार्य, निवड विद्यार्थी, पालकांचा महात्मा फुले गीत चरित्र, दीनांची साउली, ऐतिहासिक शूर महिला ग्रंथ आणि शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि मल्हारी फेटा बांधून सर्वांचा सन्मान वावरहिरे ग्रामपंचायत समोर आठवडे बाजार सभा मंडपात दि. ३१ मे २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सातारा जिल्हा विविध कार्यकारी सोसायटी, वावरहिरेचे माजी अध्यक्ष विश्वास पांढरे, सरपंच शैलाताई राऊत व ग्रा. पं. सदस्या श्रीमती शांताताई पांढरे, पाणलिंग हायस्कूलच्या मुख्याध्यापिका घनवट, बारामती बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष शामराव राऊत आणि अकलुजचे व्याख्याते व साहित्यिक प्रा. चंद्रशेखर गायकवाड सर, मंत्रालय गृह विभागाचे निवृत्त अधिकारी तानाजी भोसले व इतर मान्यवर उपस्थीत होते.
सत्कारास उत्तर देताना ढोक म्हणाले की, माझा वावरहिरे ग्रामस्थ आणि अहिल्याबाई युवा मंच यांनी सत्कार करून पुढे अजूनही खूप मोठे कार्य करावे अशा आम्हा सर्वांना शुभेच्या दिल्याने मनाला आनंद तर झालाच सोबत मोठी जबाबदारी देखील वाढली आहे. पुढे बोलताना ढोक म्हणाले की, फुले दाम्पत्यांनी अनेक सामाजिक कार्य करीत अनेक कार्य घरातून देखील केले. त्यातील एक धागा पकडून मी देखील पुणे येथील घरी व आपले वावरहिरे येथील सावतानगर येथे माझे घरी पूर्णपणे मोफत सत्यशोधक विवाह लावण्यासाठी सर्व आधुनिक सुविधासह सभामंडप तयार केले असून फुले-शाहु-आंबेडकर आणि सावित्रीबाई यांचे ३ फुटी अर्ध पुतळे स्मारक देखील उभे केले आहे. आजपर्यंत या ठिकाणी ६ व आपले परिसरात ८ असे एकूण ४८ मोफत सत्यशोधक विवाह महाराष्ट्र व तेलगांना राज्यात लावले आहेत. तरी सर्व ग्रामस्थांनी याचा सदुपयोग करून नाहक आर्थिक उधळपट्टी न करिता वाचलेल्या पैशातून काही रक्कम आपल्या पाणलिंग हायस्कूल इमारत दुरुस्तीसाठी देणगी देऊन महापुरुषांच्या कृतीशील कार्यात अंधश्रद्धा, कर्मकांड याला तिलांजली देत सहभागी व्हावे असे देखील आवाहन केले.

यावेळी वक्ते गायकवाड सर यांनी पुरोगामी विचारांची जीवनधारा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा सपूर्ण जीवनसंघर्ष आणि लोककल्याणकारी राज्य चालविताना व देशात बऱ्याच योजना राबविताना स्वतःचा व्यक्तीगत निधी फक्त मानवजातीसाठी खर्च न करीता प्राणी, पक्षी आणि आयुर्वेदिक उपचार होणे कामी प्रथम अनेक प्रकारचे वनस्पती झाडे लावून विशेष कार्य केले. अन्नछत्र व नदीकाठी घाट बांधले, या कार्याची दखल घेऊनच महात्मा फुले यांनी अहिल्या आश्रम शाळा सुरु केली, हे देखील विसरता कामा नये, असे त्यांनी प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्थाविक उमेश पांढरे, सूत्रसंचालन एकनाथ वाघमोडे यांनी केले आणि शेवटी आभार हेमकांत बुट्टे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी होणे कामी नरवीर उमाजी नाईक मंडळ, भिमज्योत तरुण मंडळ, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे मंडळ, पाणलिंग मित्र मंडळ, सावता मित्र मंडळ, एकता मित्र मंडळ यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यामुळे प्रथमच अहिल्याबाई होळकर जयंती तसेच बुद्ध पौर्णिमा कार्यक्रम मोठ्या दिमाखात विविध कार्यक्रम राबवीत सर्वांना दिवसभर पोटभर महाप्रसाद देत संपन्न झाल्याने सर्वत्र चर्चा रंगली होती. या निमित्ताने मिरवणूक आणि विविध गावांच्या गजी खेळांचे आयोजन केल्याने कार्यक्रमाची शोभा देखील वाढली होती. याप्रसंगी मुख्याध्यापिका घनवट यांच्या आवाहनास साथ देत ग्रामस्थांनी जवळजवळ ५० हजारचा निधी उपलब्ध करीत लवकरच ३ ते ४ लाख जमा करू असे आश्वासन दिले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.