रील स्टार अन् सी. ए. असलेल्या अन्वीचा मृत्यू

रायगड (बारामती सटका)
पावसाळा सुरू झाला की, सर्वत्र निसर्गातील पर्यटन स्थळ खुली होतात आणि हीच पर्यटन स्थळ प्रत्येकाला आपल्याकडे खेचण्याची भुरळ घालतात. मात्र, याच स्थळांना भेटी देण्यासाठी काही अतिउत्साहित तरुण-तरुणी आपल्या जीवाची परवा न करता तेथील परिस्थितीचा अंदाज सुद्धा लक्षात न घेता स्वतःचा जीव धोक्यात घालतात.
आषाढ आणि श्रावण महिन्यात निसर्गरम्य पर्यटन भरलं जातं. त्यातूनच फॅमिली पिकनिक आणि मित्र-मैत्रिणींसह फिरायला जाऊन निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियावर फोटो टाकणे किंवा रिल्स बनवणे यासाठी अनेक तरुण तरुणी आपला जीव धोक्यात घालून धबधब्याच्या ठिकाणी वावरतात. पाण्याच्या प्रवाहाशी खेळताना आपल्या जीवाचा खेळ या तरुणांकडून होत असतो. काही दिवसांपूर्वी पुण्यातील भुशी डॅमवर अशीच दुर्घटना घडली होती. आता रायगड जिल्ह्याच्या माणगाव कुंभ येथील जलविद्युत प्रकल्प परिसरात फिरायला गेलेल्या तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे.
माणगाव तालुक्यातील कुंभे जलविद्युत प्रकल्प असलेल्या धबधबा परिसरात ही घटना घडली आहे. व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असलेली आणि सोशल मीडियावर सोशल मीडिया इन्फ्लुएंसर म्हणून प्रसिद्ध असलेल्या अन्वीला आपला जीव गमवावा लागला आहे.
सोशल मीडियातून तिने रील स्टार म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली होती. मुंबईच्या माटुंगावरून ही तरुणी आपल्या ६ मित्रांसोबत पावसाळी सहलीसाठी या भागात फिरण्यासाठी आली मात्र, दुर्दैवाने तिची ही सहल शेवटची ठरली.
अन्वी कामदार असं या मुलीचं नाव असून सेल्फीच्या नादात तिचा धबधब्याजवळ अपघात झाला. त्यातच ती स्वतःचा जीव गमावून बसली. पावसाळी पर्यटनाचा रायगडमध्ये आत्तापर्यंतचा हा दहावा बळी आहे. अन्वी संजय कामदार (वय २७) असं या मृत तरुणीचे नाव असून ती मुंबईतील माटुंगा येथील रहिवासी होती. माटुंगा येथून पाच ते सहा जण पावसाळी पर्यटनासाठी रायगड मध्ये आले होते. अन्वी ही माणगाव परिसरात असणाऱ्या कुंभे जलविद्युत परिसरातील एका टेकडीवर रील बनवत होती. मोबाईलमध्ये रिल शूट करत असताना तिचा तेथून अचानक तोल गेला आणि ती २०० ते २५० फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेनंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्वीच्या अकाली निधनाने तिच्या मित्र परिवारात शोककळा पसरली असून तिच्या अपघाती मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
याच धर्तीवर बारामती झटका परिवार यांच्याकडून आवाहन करण्यात येत आहे की, पावसाचा आनंद जरूर घ्या पण, आपला जीव किती अनमोल आहे हे लक्षात घ्या. आपल्यासोबत आपलं कुटुंब ही आहे त्याचाही विचार करा आणि आपल्या जीवाची काळजी घ्या.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.