आगलाव्यांपासून सावध राहा; मंत्री ना. जयकुमार गोरेंचा निशाणा कोणावर ?

दहिवडी (बारामती झटका)
आपल्या हक्कासाठी लढत असताना आगलाव्यांपासून सावध राहिलं पाहिजे, हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. कामगार म्हणून आम्ही कायम तुमच्या सोबत राहिलो आहे. चालक, वाहकांची बाजू आम्ही कायम मांडलीय व मांडत राहू, असे वक्तव्य ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त दहिवडी आगारात आयोजित कार्यक्रमात ना. जयकुमार गोरे बोलत होते. या वेळी सिद्धनाथ पतसंस्थेच्या ज्येष्ठ संचालिका सौ. सोनियाताई गोरे, नगराध्यक्षा नीलम जाधव, सिध्दनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष अरुण गोरे, तसेच आगार व्यवस्थापक कुलदीप डुबल, सहाय्यक वाहतूक अधीक्षक हणमंत फडतरे, वाहतूक निरीक्षक बाबूराव खाडे, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक जगदीश लोंढे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक प्रल्हाद कबाडे आदी उपस्थित होते.
ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे म्हणाले, गिरणी कामगारांचं आंदोलन झालं. ते आंदोलन शेवटपर्यंत संपलंच नाही. आंदोलन संपता संपता गिरणी संपल्या आणि कामगार देशोधडीला लागला. माझं तुम्हा सर्वांना हेच सांगणं आहे, तुमचे हक्क, अधिकार तुम्हाला मिळालेच पाहिजेत. पण, ही व्यवस्था बंद पडेल, असं काही आपल्या हातून होऊ नये. एसटीच्या (ST) सगळ्या नेत्यांना माझी विनंती आहे.
दहिवडी आगाराशी माझं जिव्हाळ्याचं नातं आहे. हे आगार माझ्या कॉलेज जीवनाचं अविभाज्य भाग आहे.
खूप मनापासून इथले सर्व कर्मचारी काम करताना दिसत आहेत. त्यामुळेच ‘स्वच्छ व सुंदर बसस्थानक’ स्पर्धेत या आगाराने यश मिळवले. असंच चांगले काम कायम राहावं, असं मंत्री ना. जयकुमार गोरे यांनी नमूद केले.
दहिवडी येथे अद्यावत व सुसज्ज आगार कसं उभं राहील, यासाठी आपण प्रयत्न करू. त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून निधी आणण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. मात्र, आगलाव्या लोकांपासून सावध राहावे, असा सल्ला जयकुमार गोरे यांनी एसटीचे महामंडळाचे अधिकारी आणि कामगारांना दिला.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.