ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

श्री विठ्ठल रुक्मिणीचे “दास” मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीसाचे “खास” सोलापूर जिल्ह्याचे “बॉस” महास्वच्छता अभियान राबविले “खास”


पंढरपूर शहर महास्वच्छता अभियान २०२५ स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहोचवण्याचे क्रांतिकारी कार्य झाले – ग्रामविकास तथा पालकमंत्री जयकुमार गोरे

पंढरपूर (बारामती झटका)

पंढरपूर तीर्थ क्षेत्राला दक्षिण काशी संबोधले जाते. अर्थात गोरगरिबांचा बालाजी श्री विठ्ठल रुक्मिणी गोरगरीब व भोळ्या भाबड्या भक्तांच्या भावनेला साद घालणारा श्री विठुराया सुप्रसिद्ध आहे. अशा श्री विठ्ठल रुक्मिणीचे दास महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे खास, सोलापूर जिल्ह्याचे बॉस, महास्वच्छता अभियान राबविले खास, असे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे उर्फ जया भाऊ यांनी आषाढी वारीच्या पूर्वसंध्येला महास्वच्छता अभियानात ४२ ठिकाणी अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक व नागरिक यांनी स्वच्छता मोहीम राबवून बहुतांश पंढरपूर शहर स्वच्छ केले. आजी माजी लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी व प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांनी स्वयंस्फूर्तीने व मनापासून सहभाग घेऊन काम केले. सर्वांच्या कामांचे पंढरपूर पंचक्रोशीतून खूप कौतुक केले जात आहे.

पंढरपूरच्या श्री विठुरायाची सेवा करण्याची संधी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी खासकरून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी देऊन केलेली आहे. पालकमंत्री पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळून सोलापूर जिल्ह्याचे बॉस जयाभाऊ झालेले आहेत. महास्वच्छता अभियान मधील अंगातील बॉस टी-शर्ट सर्वकाही सांगून जात आहे.

आज या स्वच्छता अभियानातून १४८ टन कचरा गोळा करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून पंढरपूर शहर महास्वच्छता अभियान २०२५ अंतर्गत एकाच वेळी सकाळी ७ ते १० या कालावधीत ४२ ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून १४८ टन कचरा गोळा करण्यात आला. या मोहिमेत सोलापूर जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक, विविध सामाजिक संघटना, पंढरपूर शहरातील नागरिक यांनी सक्रिय सहभाग घेऊन ही विठुरायाची नगरी बहुतांश स्वच्छ केली आहे. या मोहिमेतून पंढरपूर शहर व येथे येणाऱ्या हजारो भाविकांच्या घरोघरी स्वच्छतेचा संदेश पोहोचविण्याचे क्रांतिकारी कार्य घडले असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

या स्वच्छता अभियानातून श्री विठुरायाची नगरी स्वच्छ करण्याचे काम आपल्या सर्वांच्या श्रमातून झालेले आहे. ही वारीपूर्वीची स्वच्छता असून वारीनंतरही स्वच्छता करण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी सोलापूर जिल्ह्यासह सातारा जिल्ह्यातीलही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला असून आजच्या मोहिमेत सात ते आठ हजार स्वयंसेवक नागरिकांनी सहभाग घेतला. यामध्ये तरुणांचा सहभाग ही महत्त्वपूर्ण बाब होती व पुढील काळात या स्वच्छतेच्या संदेशाबाबत नागरिकांमध्ये प्रबोधन करतील व स्वतःही क्रियाशीलपणे राबवतील असे त्यांनी सांगितले.

पंढरपूर शहरातील सर्व नागरिक, व्यापारी, व्यावसायिक यांनी आपापल्या दुकानासमोर कचरा टाकण्यासाठी छोट्या छोट्या कचरा पेट्या ठेवाव्यात व त्यामध्येच कचरा टाकून तो नगरपालिकेच्या कचरा संकलन टीम कडे द्यावा. त्याप्रमाणेच विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर नगरीत येणाऱ्या वारकरी भावीकांनीही कचरा कोठेही रस्त्यावर टाकू नये. नगरपरिषदेने उपलब्ध करून दिलेल्या जवळपासच्या कचराकुंड्यामध्येच कचरा टाकावा, असे आवाहन पालकमंत्री गोरे यांनी करून स्वच्छ पंढरपूर, स्वच्छ चंद्रभागा, नमामी चंद्रभागा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे त्यांनी सांगितले.

पंढरपूर हे संपूर्ण राज्यासाठी महत्त्वाचे व पवित्र धार्मिक ठिकाण असून या विठुरायाच्या नगरीच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे.

सर्व मानाच्या पालख्यांसह अन्य पालख्या, दिंड्या यांचे प्रस्थान पंढरपूरसाठी झालेले आहे. आषाढी यात्रा सोहळ्यासाठी पंढरपूर येथे आल्यानंतर या सर्वांना सर्वोच्च व्यवस्था प्रदान केली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच या मोहिमेत सहभाग घेतल्याबद्दल जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, सामाजिक संस्था, नागरिक व स्वयंसेवक यांचे त्यांनी कौतुक केले.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सफाई मित्रांचा सन्मान
आजच्या महास्वच्छता अभियानात सहभाग घेऊन स्वच्छता मोहीम राबवलेल्या काही सफाई मित्रांचा प्रतिनिधी स्वरूपात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये लक्ष्मण गोविंद सोनवणे, रविकिरण दोडिया, श्रीमती शांता विठ्ठल वाघमारे, अजय शंकर तावरे, ओंकार जनार्दन वाघमारे यांच्यासह कोळगाव ग्रामपंचायत तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. तसेच लायन्स क्लब पंढरपूर, वृक्षप्रेमी ग्रुप पंढरपूर, एव्हर ग्रीन क्लब, क्रीडाई संस्था व लोकमान्य विद्यालय पंढरपूर यांचाही सत्कार करण्यात आला.

महास्वच्छता अभियानाचा शुभारंभ
पंढरपूर शहर महास्वच्छता अभियान २०२५ चा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व अन्य मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात स्वच्छता केली. पंढरपूर नगरी स्वच्छ होऊन चकाचक केलेली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button