आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून मुलांनी करिअरसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी – प्रा. शरद गोरे
विठ्ठलवाडी येथे गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्तांचा सत्कार
माढा (बारामती झटका) राजेंद्र गुंड यांजकडून
प्रत्येक आई-वडिल आपल्या मुलांचे भवितव्य घडावे यासाठी अहोरात्र प्रामाणिकपणे कष्ट व त्याग करतात, याची जाणीव प्रत्येक मुलांनी उराशी बाळगून आपले स्वप्न व ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असे प्रतिपादन पुणे येथील साहित्य परिषदेचे अध्यक्ष साहित्यिक प्रा. शरद गोरे यांनी केले.
ते विठ्ठलवाडी ता.माढा येथे श्री स्वामी समर्थ ग्रामीण पतसंस्था व ग्रामपंचायतीच्यावतीने आयोजित कार्यक्रमात दि. ६ जुलै रोजी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच संगीता अनिलकुमार अनभुले होत्या.
पुढे बोलताना शरद गोरे म्हणाले की, गावोगावच्या पालकांनी इतर बाबींवर अनावश्यक खर्च करण्यापेक्षा आपल्या मुलांच्या शिक्षणावर गरजेनुसार खर्च करावा. मुलांना मोबाईल, टिव्ही, संगणक, फेसबुक आदींपासून दूर ठेवून पुस्तके, वृत्तपत्रे व ग्रंथ वाचण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये चांगली गुणवत्ता आहे, त्यामुळे अपयश आले तरी न खचता यश मिळेपर्यंत प्रयत्न केला पाहिजे असे त्यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सेवा दलाचे तालुकाध्यक्ष अशोक शिंदे म्हणाले की, सत्कारातून प्रेरणा व उत्तेजन मिळते. या गुणी विद्यार्थ्यांमधून अधिकारी, डॉक्टर, वकील, शिक्षक बनून विठ्ठलवाडी गावाचा नावलौकिक नक्कीच वाढवतील असा आशावाद व्यक्त केला. अथक परिश्रम, जिद्द, चिकाटी व आत्मविश्र्वासाच्या जोरावर कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होता येते असे त्यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड यांनी केले तर सूत्रसंचालन करून आभार गोरखनाथ शेगर यांनी मानले. यावेळी विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक संदीप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दलाचे तालुकाध्यक्ष अशोक शिंदे, अंजनगाव खेलोबाचे उपसरपंच भागवत चौगुले, चेअरमन अनिलकुमार अनभुले, आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड, माजी सरपंच बालाजी गव्हाणे, उपलेखापरीक्षक सुहास शिंगाडे, धनाजी सस्ते, सचिव सुशेन भांगे, नेताजी कदम, हनुमंत पाटील, महादेव कदम, श्रीमंत कदम, नेताजी उबाळे, बतुवेल रावडे, बबन घोडके, राजाभाऊ कदम, मारुती शेंडगे, दिनेश गुंड, धर्मा उमाटे, सतीश गुंड, कैलास सस्ते, शिवाजी कोकाटे, कैलास खैरे, विश्वनाथ खा़ंडेकर, सतीश शेंडगे, संदीप मुळे, दिनेश कदम, मधूकर कदम, भिमराव नागटिळक, युवराज शेगर, नेताजी खैरे, पोपट शिंदे, भिमराव शेगर यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध, एटीएस स्पर्धा परीक्षेत राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर क्रमांक पटकाविलेल्या, माध्यमिक विद्यालयातील १० वीत बोर्डाच्या परीक्षेत गुणानुक्रमे पहिले पाच विद्यार्थ्यी, स्वरांजली बरकडे हिचा बीएएमएस ला प्रवेश मिळाल्याबद्दल, सेवानिवृत्तीनिमित्त माध्यमिक शिक्षक सुरेश शेंडगे, सुभेदार अर्जुन माने, मेजर बालाजी कदम, रोटरी क्लबचा पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. मोहन शेगर, कलाकार रणजित जाधव, राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात दुसरा क्रमांक पटकाविल्याबद्दल नितेश कदम, आयआयटी मुंबई येथे निवड झाल्याबद्दल ओंकार कदम, नवोदय विद्यालय निवडीबद्दल यशवंत नागटिळक यांचा साहित्यिक प्रा. शरद गोरे, उपसरपंच भागवत चौगुले, विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक संदीप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सेवा दलाचे तालुकाध्यक्ष अशोक शिंदे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng