आरटीओच्या बदल्यांमध्ये ‘चिठ्ठ्यां’ ना फुटले पाय
वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांचा परिवहनमध्ये हस्तक्षेप ?
पुणे (बारामती झटका)
राज्यातील प्रादेशिक परिवहन विभागातील प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्थात आरटीओच्या बदल्यांची प्रक्रिया वादात सापडण्याची शक्यता आहे. मार्च २०२४ मध्ये सचिव पातळीवर चिठ्ठ्या टाकून तयार करण्यात आलेल्या बदल्यांच्या नियुक्त्यांमध्ये फेरफार करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या नेमणुका देत असताना एका वरिष्ठ सनदी आयपीएस अधिकाऱ्याने हस्तक्षेप केल्याची चर्चा असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यात लक्ष घालण्याची मागणी होत आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक महसुली उत्पन्न देणारे खाते म्हणून परिवहन विभागाकडे पाहिले जाते. या ठिकाणी नेमणूक मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहारही पार पडत असतात. काही वर्षांपूर्वी बदल्यांच्या प्रक्रियेत काही अधिकारीच सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला होता. तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही बदल्यांच्या नियुक्ती करत असताना आर्थिक गैरव्यवहार केले असल्याचे आरोप काही अधिकाऱ्यांनी केले होते. त्यामुळे हा विभाग नेहमीच चर्चेत असतो. बदल्यांमधील या गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी महायुती सरकारने बदल्यांची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यानुसार विशिष्ट लेव्हलच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या ऑनलाइन पद्धतीने केल्या जात आहेत. मात्र, या विभागातील सर्वोच्च पद असलेल्या आरटीओ अर्थात प्रादेशिक परिवहन अधिकारी या पदाच्या बदल्या मात्र, चिठ्ठ्या टाकून करण्यात आल्या होत्या.
मार्च २०२४ मध्ये परिवहनचे सचिव तसेच आयुक्त यांच्या उपस्थितीत रिक्त असलेल्या आरटीओच्या बदल्यांसाठी चिठ्ठ्या टाकून नियुक्तीचे आदेश देण्यात आले होते. मात्र, निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या नियुक्त्या गुरुवारी जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अनेक आरटीओ अधिकाऱ्यांना चिठ्ठ्यांप्रमाणे आदेश न देता त्यात परस्पर बदल केले गेल्याचे दिसून आले. पनवेल, बोरिवली, नागपूर, अकोला, नाशिक, चंद्रपूर, पुणे या ठिकाणी ज्यांची नियुक्ती केली गेली होती, त्या ठिकाणी अन्य अधिकाऱ्यांच्या ‘अंशतः बदल’ या नियमाचा वापर करून नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या बदली प्रक्रियेमध्ये ठाणे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ सनदी आयपीएस अधिकाऱ्याने हस्तक्षेप केल्याची चर्चा असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री कार्यालयाला अंधारात ठेवून हा प्रकार केला गेल्याचीही चर्चा खात्यांतर्गत रंगली आहे. याबाबत काही अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता बदल्यांच्या यादीमध्ये छेडछाड झाल्याचे मान्य केले. त्यामुळे वशिलेबाजीच्या दाव्याला पुष्टी मिळत आहे.
चिठ्ठ्या टाकून झालेली प्रक्रिया रद्द का केली?
अकलूज विभागाच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांची मार्चमध्ये काढलेल्या चिठ्ठ्यांमध्ये चंद्रपूर या ठिकाणी बदली झाल्याचे आदेश काढण्यात आले होते. मात्र, गुरुवारी निघालेल्या आदेशामध्ये गायकवाड यांना पुणे या सर्वात महसूल मिळवून देणाऱ्या ठिकाणी बदली देण्यात आल्याचे आदेश सह परिवहन आयुक्त (प्रशासन) यांनी काढले आहेत. बदल करण्यात आलेल्या बदलांसाठी एका सनदी अधिकाऱ्यामार्फत मोठे सेटिंग झाल्याची चर्चा असून चिठ्ठ्या टाकून झालेली प्रक्रिया का रद्द करण्यात आली, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.