ताज्या बातम्यासामाजिक

आषाढी वारी पालखी सोहळा जर्मन मंडप व वॉटरप्रूफ मंडपाने यंदा वारीची हटके तयारी झाली.

प्रशासनाकडून वॉटरप्रूफ मंडप, मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र व ठिकठिकाणी दिशादर्शक फलकमुळे मार्ग सुखकर…

माळशिरस (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी आषाढी वारी पालखी सोहळ्याचे हटके नियोजन केलेले आहे. मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र योजनेअंतर्गत एकाच छताखाली निवारा कक्ष, चरण सेवा आरोग्य सुविधा, हिरकणी कक्ष, पिण्याचे पाणी, शौचालय, स्नानगृह, चार्जिंग स्टेशन अशा उपलब्ध सुविधा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या आहेत.

यंदाच्या वर्षी वरूणराजाने मे महिन्यातच हजेरी लावलेली आहे. बळीराजा शेतामधील कामे आटोपून समाधानाने पायीवारी पालखी सोहळ्यामध्ये लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी आहेत. गेल्या महिन्यापासून जिल्ह्यातील प्रशासन कामाला लागलेले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यंदाची आषाढी वारी हटके केलेली आहे. कोणत्याच गोष्टीची कमतरता ठेवलेली नाही. प्रशासन ज्ञानोबा माऊली व तुकाराम महाराजांच्या पालखी स्वागतासाठी सज्ज झाले आहे.

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा ३० जूनला तर श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा १ जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करीत आहे. यावर्षी नेहमीच्या सेवा सुविधांबरोबरच प्रशासनाने वारकरी व भाविकांसाठी विविध सेवासुविधांसह हटके नियोजन केल्याने सर्वांचा या पालखी सोहळ्यातील प्रवास सुखकर करण्यात प्रशासन यशस्वी होणार, असे दिसून येत आहे.

वारकऱ्यांसाठी वॉटरप्रूफ मंडप, सर्व गावांमध्ये ठिकाणे दर्शक फलक, सेवा दर्शक फलक लावण्यात येत असल्याने पालखी सोहळ्यातील दिंडीकरी, वारकऱ्यांबरोबरच टँकर भरणाऱ्या वाहनांना सहज माहिती उपलब्ध होणार आहे. पालखीसोबत चालणाऱ्या वारकऱ्यांना, दिंडीमधील वारकऱ्यांना व सोबत असणाऱ्या वाहनांना प्रत्येक गावात आपले मुक्कामाचे ठिकाण, पाणी भरण्याचे ठिकाण, आरोग्य कक्ष, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आदी शोधण्यास अवघड जाते. परंतु, यावर्षी जिल्हा परिषदेने ठिकठिकाणी टँकर भरणा केंद्र, पालखी विसावा व वारकरी सुविधा केंद्र, पालखीतळ, गोल रिंगण आदींबाबत फलके लावली आहेत. त्याचबरोबर सर्वत्र पावसाळी हवामान असल्याने पाऊस आल्यानंतर वारकऱ्यांना निवाऱ्याची सोय व्हावी यासाठी ठिकठिकाणी यावर्षी प्रथमच वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आले आहेत.

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, प्रांताधिकारी विजया पांगरकर, कार्यकारी अभियंता सुनीता पाटील, महावितरण कार्यकारी अभियंता, पोलीस उपविभागीय अधिकारी नारायण शिरगांवकर, गटविकास अधिकारी डॉक्टर आबासाहेब पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रियांका शिंदे, नातेपुते माळशिरस श्रीपुर महाळुंग नगर पंचायत व अकलूज नगर परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली पालखीच्या सेवा-सुविधांची तयारी पाहून सर्व स्तरांतून समाधान व्यक्त होत आहे.

ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषदेकडून मिळणार या सुविधा
पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींनी स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, हिरकणी कक्ष, आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, स्नानगृह, वैद्यकीय सेवा कक्ष, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, कचराकुंडी, प्लास्टिक संकलन केंद्र, विश्रांती कक्ष, फूट मसाजर कुठे आहे याचे फलक, गावाच्या नकाशाचे फलक लावल्याने सर्वांना आपले ठिकाण शोधणे सोपे जाणार आहे.

भाविकांना वारीमध्ये कोणत्याच प्रकारे अडचण येणार नाही अशा पद्धतीने प्रशासनाने चांगले व योग्य नियोजन केलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button