ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडमुठ्या धोरणामुळे महिलांची सुरक्षा धोक्यात…

आषाढी वारीतील माऊलींच्या पालखी सोहळ्यात महिलांची छेडछाड व गैरप्रकार झाल्यास जबाबदार कोण ?

नातेपुते (बारामती झटका)

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत नातेपुते दुय्यम बाजार समिती आहे. सदरच्या ठिकाणी प्रशस्त व मोकळी जागा भरपूर आहे. सदरच्या ठिकाणी आषाढी वारीतील पालखी सोहळ्याच्या वेळी पाळणे, लहान मुलांची विविध खेळणी, छोट्या छोट्या व्यावसायिकांची दुकाने थाटली जातात. मात्र, यावर्षी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासन किंवा बाजार समितीचे ठेकेदार यांच्या वाढीव आर्थिक आडमुठ्या धोरणामुळे लोकवस्ती सोडून उजाड माळरानावर पाळणे उभे केलेले असल्याने महिलांची सुरक्षा धोक्यात येणार आहे. आषाढी वारीतील माऊलींच्या पालखी सोहळ्यात माळरानावर महिलांची छेडछाड व गैरप्रकार झाल्यास जबाबदार कोण ?, असा नातेपुते नगरीतील सुज्ञ नागरिकांमधून प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आषाढी वारीत कैवल्य साम्राज्य श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पायी पालखी वारी सोहळा आळंदीहून पंढरपूरच्या दिशेने येत असतो. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्याच्या सरहद्दीवर माऊलींच्या पालखीचे स्वागत होऊन पहिला मुक्काम नातेपुते येथे असतो. नातेपुते मोठे शहर असून उद्योग व्यवसायासाठी सुपरीचीत आहे. सदरच्या गावचा व नातेपुते पंचक्रोशीतील 30 ते 35 गावांचा दैनंदिन संबंध येत असतो. नातेपुते नगरीमध्ये माऊलींच्या पालखी सोहळ्यातील उत्सव महिला व लहान मुलांना आनंदाची पर्वणी ठरत असते. वर्षातून एकदाच माऊलींच्या आशीर्वादाने आनंद साजरा करण्याचा योग येतो. पोलीस प्रशासन यांच्याकडून वारीच्या वेळेला चोख बंदोबस्त ठेवला जातो. वाहतूक सुरळीत केली जाते. भाविकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही, याची काळजी पोलीस प्रशासनाकडून घेतली जाते.

दरवर्षी लोकवस्तीमध्ये पाळणे व इतर खेळणी असल्याने पोलीस प्रशासनाला वाहतूक व इतर सुरक्षा देत असताना अशा गोष्टींवर बारीक लक्ष ठेवता येत असते. मात्र, यंदा लोकवस्तीच्या बाहेर पाळणे व इतर खेळणीचे साहित्य उभारलेले असल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित राहत आहे. लोकवस्ती असूनसुद्धा काही उनाड व टपोरे युवकांकडून अनुचित प्रकार घडत असतात. अशा वेळेला पोलीस प्रशासनाचा धाक व अंकुश असल्याने गैरप्रकार टळले जातात. लोकवस्ती सोडून उभारलेले पाळणे व इतर मौजमजा करण्याचे, खेळण्याचे साहित्य उभारलेले आहे. महिलांना व लहान मुलांना याचा मनसोक्त आनंद घेता येणार नाही. पाळणे लोकवस्तीत नसल्याने महिला व लहान मुलांच्या आनंदावर विरजण पडणार आहे. लहान मुलांच्या लाडामुळे किंवा आग्रहामुळे महिलांना असुरक्षित ठिकाणी जावे लागणार आहे. जर त्या ठिकाणी अनुचित प्रकार घडला तर जबाबदार कोण ?, असा सुज्ञ नागरिकांमधून सवाल उपस्थित होत आहे.

पाळणामालक, पाळणा ठेकेदार, जागा मालक, परवानगी देणारा अधिकारी असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. जर अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी जास्ती अपेक्षा न ठेवता नेहमीप्रमाणे जागा उपलब्ध करून दिली असती तर महिलांची सुरक्षा धोक्यात न येता आनंदाने पालखी सोहळ्यामध्ये लहान मुलांसह आनंद घेता आला असता. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडमुठ्या धोरणामुळे व्यावसायिकांच्या व्यवसायावरसुद्धा परिणाम होऊन त्यांचे आर्थिक उत्पन्न घटणार आहे व महिलांच्या आनंदावर विरजण पडणार आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button