कृषिवार्ताताज्या बातम्यासामाजिक

भागवत पवार यांना नवी दिल्ली येथे अनार गौरव पुरस्काराने सन्मानित…

अकलूज (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील तामशिदवाडी येथील श्रीमती जाईबाई पांडुरंग वाघमोडे विद्यालयाचे अध्यक्ष भागवत उत्तम पवार यांना कृषी क्षेत्रातील भरीव कार्याबद्दल नवी दिल्ली येथे अनार गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

मौजे सदाशिवनगर-तामशिदवाडी येथील प्रगतशील बागायतदार भागवत (भाऊ) पवार यांना निर्यातक्षम गुणवत्तेच्या सातत्यपूर्ण डाळींब उत्पादनासाठी तसेच दुसऱ्या डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना केलेल्या मोफत मार्गदर्शनाची दखल घेत डाळींब संशोधन केंद्र सोलापूर तर्फे दिला जाणारा ‘अनार गौरव पुरस्कार’ राष्ट्रीय कृषी विज्ञान संकुल नवी दिल्ली येथे नुकताच प्रदान करण्यात आला. उच्च मूल्य बागायती पिकाचे उत्पादन, मूल्यवर्धन आणि निर्यात भागधारकाच्या बैठकीमध्ये डॉ. एस. के. सिंह उपमहासंचालक फलोत्पादन यांच्या शुभहस्ते व डॉ. एस. एन. झा उपमहासंचालक कृषी अभियांत्रिकी, श्रीमती विनिता सुधांशू महाव्यवस्थापक एपीडा यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार देण्यात आला.

या पूर्वीही भागवत (भाऊ) पवार यांना शेतीविषयक अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी राज्य डाळिंब उत्पादक संघाचे संचालक म्हणून अनेक वर्ष काम केले आहे. तसेच डाळिंब रत्न पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. आजचा पुरस्कार मिळाल्याबद्दल राज्यभरातील बागायतदार शेतकरी भागवत पवार यांचे भ्रमणध्वनी द्वारे व समक्ष भेटून अभिनंदन करून शुभेच्छा देत आहेत. श्री. पवार हे अत्याधुनिक पद्धतीने शेती करत असताना त्यांनी आजपर्यंत केळी, डाळिंब, द्राक्षे, गोल्डन सिताफळ, पेरू, शेवग्याच्या शेंगा, लिंबू इत्यादी पिके उत्तम प्रतिची घेतलेली आहेत. त्यांची कोणतीच फळबाग आजपर्यंत कधीच फेल गेलेली नाही. भाऊंनी आजपर्यंत राज्यातील अनेक शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन केलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button