रात्री झोप नीट होत असेल तर…

माळशिरस (बारामती झटका)
एखाद्या रात्री आपली झोप नीट झाली नाही तर आपला दुसरा दिवस कसा जातो ? सतत आपल्याला हे जाणवत राहतं की, आपली झोप झाली नाहीये. डोळे चुरचुरतात. जे काही काम आपल्याला करायचं असतं त्याच्यामध्ये नीट एकाग्रता राहत नाही. असंच काही काळ चालू राहिलं तर याचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम आपल्या स्मरणशक्तीवर होते. याचं कारण असं आहे की, झोप ही आपल्या आयुष्यासाठी अत्यंत महत्त्वाची देणगी आहे. आपल्याला दररोज झोप येत नसेल तर त्या संदर्भात योग्य ते औषधोपचार करायला हवेत आपली झोप नीट असावी, असं वाटत असेल तर, दिवसभरामध्ये योग्य परिश्रमही करायला हवेत म्हणजे दमून रात्री नीट झोप लागेल.
आजकाल मुलं रात्री हातात मोबाईल घेऊन त्याच्यावर वेळ घालवत असतील तर त्यांना सकाळी नीट जाग येत नाही. ही मुलं वेळेवर उठत नाहीत. सकाळी खूप लवकर शाळा किंवा कॉलेज असेल तर झोप अपुरी राहते आणि याचा परिणाम त्यांच्या एकाग्रतेवर आणि पर्यायाने स्मरणशक्तीवर होतो.
रात्री जागून अभ्यास केला आणि सकाळी परीक्षेला गेलं तर आठवेलच असं नाही. याचं कारण अपुऱ्या झोपेमुळे मेंदूतली रसायन नीट काम करत नाहीत. याचा परिणाम एकूणच अभ्यासावर आणि कामावर होतो. म्हणून अभ्यास आणि दिवसभराची काम नीट व्हावी अशी इच्छा असेल तर रात्रीच्या शांत झोपेला पर्याय नाही.
आपल्यासाठी रात्रीची वेळ ही विश्रांतीची वेळ आहे. ती मेंदूच्या कामासाठी अत्यंत आवश्यक आहे कारण, रात्रीच्या सात ते आठ तासांच्या झोपेमध्ये मेंदू फार महत्त्वाची कामं करत असतो. त्याच्या कामांना तितका वेळ लागतो. म्हणून हे लक्षात घेऊन आपल्या दिनक्रमामध्ये व्यायामाला जागा असावी, मुलं भरपूर खेळलीही पाहिजेत.
प्रत्येकाने योग्य परिश्रम करायला हवेत. ताणतणाव असतील तर त्याचा योग्य प्रकारे निचरा करायला हवा. दिवसभराच्या सर्व कामांचा व्यवस्थापन असतं, तसं शांत झोपेचंही वेळापत्रक व्यवस्थित बसवायला पाहिजे. तसं नसेल तर हळूहळू तशी सवय लावायला पाहिजे. झोप लागेपर्यंत आपली कामं, वाचन सुरू ठेवावे. काही दिवसांत हा ताल व्यवस्थित जमेल.
डॉ. श्रुती पानसे, मेंदू आणि शिक्षण अभ्यासक
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng