एक पक्ष, एक झेंडा, एकच नेता जपणारे प्रामाणिक नेते शामराव भोसले – बी. टी. शिवशरण

श्रीपूर (बारामती झटका)
सामाजिक, राजकीय चळवळीत गेली चाळीस ते पंचेचाळीस वर्षे माळशिरस तालुक्यात आपले कर्तृत्व नेतृत्व प्रामाणिकपणाने सिध्द करणारे व आयुष्यभर एक पक्ष, एक झेंडा, एकच नेता जपणारे महाळुंगचे शामराव भोसले यांच्या जिवनाचा आलेख कायम उंचावत राहिलेला आहे. दलित पँथर पासून ते आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट या पक्षाचे दमदार व जोमदार काम करून निस्वार्थी भावनेने काम करत आहेत. दलित पँथरच्या चळवळीतील ते खंदे शिलेदार म्हणून ओळखले जातात. गावगाडा समाजकारण राजकारण यामध्ये सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते त्यांना विश्वासाने त्यांचे बरोबर सहभागी करून घेतात. मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा लढा यामध्ये त्यांनी अत्यंत धाडसाने माळशिरस तालुक्यात आंदोलनात झोकून देऊन काम केले आहे. मोर्चे, बंद, धरणे आंदोलन, रास्तारोको या सनदशीर मार्गाने आंदोलन यशस्वी केली आहेत.
माळशिरस तालुक्यातील गायरान जमीनीचा प्रश्न, दलित विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे शिक्षणाचे प्रश्न, फी माफी, मोफत प्रवेश या बाबत ते पहिल्यापासून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर राहिले आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांचे समवेत ते गेली पंचेचाळीस वर्षे दलित चळवळ, आंबेडकरी चळवळ, रिपब्लिकन पक्ष यामध्ये ते पुर्णवेळ सक्रिय आहेत. गावगाडा समाज यातील तंटे वाद ते सामोपचाराने तोडगा काढून मिटवतात. कोणावरही कसल्याही प्रकारचा अन्याय, अत्याचार होणार नाही याची ते दक्षता घेतात. नविन लग्न झालेल्या व वर्ष दोन वर्षांत सासुरवास देणंघेणं यावरून नवरा बायकोमध्ये वाद विकोपाला गेला असेल तर दोन्ही बाजूंचे नातेवाईक यांना समक्ष बोलाऊन त्यांना समजावून सांगतात. ताटातूट होऊ देत नाहीत, असे अनेक प्रश्न शामराव भोसले यांनी सोडवून दिलजमाई घडवून आणली आहे.
येथील साखर कारखान्यात स्थानिक पातळीवर नोकर भरतीचा प्रश्न त्यांनी व्यवस्थापन यांचेबरोबर सकारात्मक चर्चा करून अनेकांना कारखान्यात नोकरी मिळवून दिली आहे. सुरवातीला स्थानिक पातळीवर येथील तरुणांना नोकरी देण्यात तत्कालीन व्यवस्थापन टाळाटाळ करत होते. तेव्हा शामराव भोसले यांनी महाळुंग-श्रीपूर पंचक्रोशीतील रिपब्लिकन पक्षाचे वतीने कारखान्यावर प्रचंड मोठा मोर्चा काढला होता. त्यानंतर टप्प्या-टप्प्याचे तरुणांना नोकरीमध्ये सामावुन घेतले आहे. शामराव भोसले हे अत्यंत मनमिळाऊ स्वभाव, संयमी नेतृत्व असलेले, तळागाळातील सर्व लोकांपर्यंत मिळून मिसळून वागणारे, धाडसी नेते म्हणून ओळखले जातात. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जातात. सोलापूर जिल्ह्यात रामदास आठवले यांच्या दौऱ्यात शामराव भोसले कायम उपस्थित असतात. आठवले त्यांची विचारपूस करुन मनमोकळ्या गप्पा, चर्चा करतात.
शामराव भोसले यांचे सामाजिक, राजकीय व चळवळींचे ही जमेची बाजू. तर, दुसरी बाजू अशी की ते श्वान प्रेमी आहेत. त्यांचेकडे एक गावठी कुत्रा आहे, त्याचे नाव त्यांनी गब्बर ठेवले आहे. गब्बर व शामराव भोसले यांचे नाते इतके अतुट झाले आहे की, शामराव भोसले हे कुठेही निघाले की गब्बर त्यांचे बरोबर असणारच. संध्याकाळी शामराव भोसले उशिरा घरी आले तर ते घरी येत नाहीत, तोपर्यंत गब्बर अन्नाला तोंड लावत नाही. संध्याकाळी शामराव घरासमोर पटांगणात झोपतात, तेथे त्यांच्या पायाशी खाली गब्बर झोपणार. एकदा शामराव रात्री झोपले होते. मध्यरात्री एक मोठा साप ते झोपलेल्या ठिकाणी येऊ लागला, तेव्हा तो मोठा साप गब्बर ने शामराव भोसले यांच्यापर्यंत येऊ दिला नाही. भुंकुन भुंकुन शामराव भोसले यांना जागे केले तेव्हा, शामराव यांनी समोर पाहिले तर भला मोठा साप गब्बरने रोखून ठेवला होता. संध्याकाळी शामराव गावात फिरायला निघाले की गब्बर त्यांचेबरोबर असणारच. स्मशानभूमीत शामराव एखाद्याचा अंत्यविधी, अस्थी विसर्जनसाठी गेले तर गब्बरही त्यांचे सोबत कायम स्मशानभूमीत जाणार. एकदा शामराव भोसले आजारी पडले. त्यांना अकलूज व श्रीपूर मध्ये दवाखान्यात चार दिवस उपचारासाठी दाखल करावे लागले. गब्बर महाळुंग मध्ये घरी होता. शामराव भोसले घरी दिसत नाहीत म्हणून गब्बरने अन्न पाणी वर्ज्य केले, ही माहिती मुलांनी शामराव यांना दवाखान्यात सांगितली. तेव्हा शामराव यांच्या मुलांनी महाळुंग मध्ये जाऊन व्हिडिओ कॉल करून शामराव यांना गब्बरला दाखवले तेव्हा गब्बरच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू येत होते. शामराव गब्बरला बोलले गब्बर जेवण कर, मी संध्याकाळी घरी येतोय. इतपत दोघांचं आपुलकीचे नाते निर्माण झाले आहे.
शामराव यांचं शिक्षण कमी झालंय परंतु, चांगले शिकलेल्यापेक्षा त्यांचे विचार, भुमिका कार्य महत्वाचे आहे, ते सभेत चांगले भाषण करु शकतात. माळशिरस तालुक्यात सर्वजण त्यांचा आदर सन्मान करतात. श्रीपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयात गेली तीन वर्षे त्यांच्या वतीने दैनिक लोकमत, दैनिक सकाळ हे दोन पेपर सुरू आहेत. असो, अनेक घटना, अनेक प्रसंग माहिती सांगण्यासारखी आहे परंतु, लेखाला मर्यादा आहेत. उद्या १ जुन रोजी त्यांचा एकसष्टी सोहळा आहे, त्यांना वाढदिवसाच्या अंतःकरणपुर्वक हार्दिक शुभेच्छा…
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.