कुरभावी येथील नीरा नदीच्या पुरात अडकलेल्या एकाच कुटुंबातील ६ लोकांची सुटका, एनडीआरएफ च्या मदतीने झाली…

प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार सुरेश शेजुळ, निवासी नायब तहसीलदार अमोल कदम पूर परिस्थितीवर अलर्ट…
माळशिरस (बारामती झटका)
नीरा-भीमा खोऱ्यात पावसाचा जोर वाढलेला आहे. सद्यस्थितीत निरा नदी पात्रातून 25,25,300 चा विसर्ग वाढलेला आहे वाढलेला विसर्ग पाहता भीमा नदी पात्रातील सर्व बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत. नीरा-नदीला आलेल्या पुरामुळे कुरबावी, ता. माळशिरस येथील निरा नदीच्या पुरात अडकलेले राजेंद्र भीमराव ढवळे वय 36, दीपक आजिनाथ ढवळे वय 34, दत्तात्रय रामचंद्र ढवळे वय 70, वर्षा विवेक ढवळे वय 30, वर्षा राजेंद्र ढवळे वय 34, संचित विवेक ढवळे वय 14 यांना एनडीआरएफ जवानांच्या मदतीने पुरात अडकलेल्या ढवळे कुटुंबांना सुखरूप बाहेर काढलेले आहे. तहसीलदार सुरेश शेजुळ व निवासी नायब तहसीलदार अमोल कदम रात्रभर नदीपात्राच्या ठिकाणी उपस्थित होते. एनडीआरएफ जवानांचे कौतुक केले जात आहे.
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते शासकीय कामानिमित्त मतदार संघाच्या बाहेर होते. कार्यकर्त्यांनी परिस्थितीची माहिती दिली. ढवळे कुटुंब पुराच्या पाण्यात अडकलेले आहेत, याची माहिती मिळताच तातडीने जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून तात्काळ मदत करण्याचे आवाहन करून पूरग्रस्त कुटुंबांचे स्थलांतरण करावे. ओढे, नाले, पुलावरील रस्त्यावर पाणी आलेल्या ठिकाणी बॅरिगेट लावून वाहतूक बंद करण्याच्या सूचना केलेल्या होत्या.

उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी विजया पांगारकर यांनी निरा व भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देऊन उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज तहसीलदार, माळशिरस गटविकास अधिकारी व पोलीस निरीक्षक अकलूज माळशिरस व सहाय्यक पोलीस निरीक्षक वेळापूर नातेपुते यांना सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहेत. काही दिवसापासून निरा खोरे व भीमा खोरे मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने निरा नदी पात्रात 26,52,536 इतका विसर्ग येत आहे. भीमा नदी पात्रातील कोल्हापूर पद्धतीचे बंधाऱ्यांमध्ये आधीपासूनच पाणीसाठा आहे. त्यामुळे सद्यस्थितीतील विसर्ग पाहता निरा व भीमा नदीपात्रातील सर्व कोल्हापूर बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत. तरी काठावरील गावांना व नागरिकांना आपले स्तरावरून सतर्कतेचा इशारा देऊन आवश्यक तिथे रस्ते व वाहतूक बंद करण्यात यावे. जिथे पाणी पातळी वाढत आहे तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी व्यवस्था कराव्या, अशा सूचना प्रांताधिकारी यांनी केलेल्या होत्या. सदरच्या सूचनांची अंमलबजावणी प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून केली जात आहे. कळंबोली येथील 40 कुटुंबातील 163 लोकांना नातेवाईकांकडे स्थलांतरित केलेले आहे पळसमंडळ येथील 06 कुटुंबातील 28 लोकांना नातेवाईकांकडे स्थलांतरित केलेले आहे. बिजवडी येथील 10 कुटुंबातील 35 लोकांना जिल्हा परिषद शाळा व नातेवाईकांकडे स्थलांतरित केलेले आहे. कदमवाडी येथील 04 कुटुंबातील 20 लोकांना नातेवाईकांकडे स्थलांतरित केलेले आहे. तिरवंडी येथील 10 कुटुंबातील 63 लोकांना नातेवाईकांकडे स्थलांतरित केलेले आहे. उंबरे दहिगाव येथील 05 कुटुंबांतील 26 लोकांना नातेवाईकांकडे स्थलांतरित केलेले आहे. माळशिरस तालुक्यातील महसूल प्रशासन अलर्ट असून आपत्ती व्यवस्थापन सज्ज आहे, त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.