जागृत राहून अन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवा – नीतेश कराळे.

अकलूज येथे मूकनायक परिसंवाद कार्यक्रम उत्साहात
नातेपुते (बारामती झटका)
सध्या जनतेला चहूबाजूने घेरले जात आहे. जनतेची शुद्ध फसवणूक सुरू आहे. या होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात जनतेने आवाज उठवला पाहिजे. महत्त्वाचे प्रश्न दडपण्यासाठी विविध विषय उकरून सरकार लोकांची दिशाभूल करताना दिसत आहे, यावर लोकांनी आता जागृत राहून आवाज उठवला पाहिजे, असे मत फिनिक्स अकॅडमीचे संचालक तथा सुप्रसिद्ध व्याख्याते नितेश कराळे मास्तर यांनी व्यक्त केले.
मूकनायक प्रतिष्ठानच्यावतीने मूकनायक परिसंवाद या कार्यक्रमाचे आयोजन अकलुज येथे करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पांडूरंग नलावडे हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रतिमा पूजन करून पूज्य भंतेजी गोविंदो मानदो यांचेकडून त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले.
याप्रसंगी पुढे बोलताना कराळे मास्तर म्हणाले की, सध्या देशातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्वतंत्र कार्य करणाऱ्या शासकीय संस्थांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर सुरू असून देशामध्ये अराजकता माजेल अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे. त्यामुळे लोकांनी सजग नागरीकांप्रमाणे वागून या देशासाठी जागरूक राहणे गरजेचे वाटू लागले आहे. मूकनायक प्रतिष्ठानने या कार्यक्रमाचे आयोजन करून समाजासमोर आदर्श घालून दिला आहे, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
यावेळी विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या मान्यवरांना याप्रसंगी मूकनायक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये पत्रकार क्षेत्रातील उत्कृष्ट पत्रकारिता हा पुरस्कार एल. डी. वाघमोडे, साहित्य क्षेत्रातील पुरस्कार बा. ना. धांडोरे, विधिज्ञ क्षेत्रातील पुरस्कार ॲड. सुमित सावंत तर शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार सुनंदा काटे वाघमारे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल शाहीर राजेंद्र कांबळे खुडुसकर यांनाही विशेष सन्मान करून गौरवण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन मूकनायक प्रतिष्ठानचे पत्रकार बांधव डी. एस. गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, सागर खरात, सुजित सातपुते, कैलास कांबळे यांनी केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागेश लोंढे यांनी केले तर आभार आनंदकुमार लोंढे यांनी मानले.
पुस्तके खरेदीसाठी झुंबड…
सदरच्या परिसंवाद कार्यक्रमात वैचारिक पुस्तकांची विक्री करण्यासाठी बुक स्टॉल्स उभे करण्यात आले होते. याचा लाभ सर्वांनी घेतला. सवलतीच्या दरात पुस्तके उपलब्ध झाल्याने असंख्य वाचकांनी या ठिकाणी विविध पुस्तकांची खरेदी केली. जवळपास या कार्यक्रमातून सव्वा लाख रुपयांची पुस्तके वाचकांनी खरेदी केली. पुस्तके खरेदी करण्यासाठी अक्षरशः झुंबड उडालेली दिसली.
मूकनायक प्रतिष्ठानच्यावतीने मागील तीन वर्षापासून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेतील योगदानाला उजाळा मिळावा यासाठी समता सैनिक दल प्रमुख, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मूकनायक प्रतिष्ठानची स्थापना केली. वैचारिक आणि सामाजिक प्रबोधनपर अशा कार्यक्रमाचे आयोजन करून या प्रतिष्ठानने आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.