जिंकले की ओके, हरले की ओरड

सुप्रीम कोर्टाचे विरोधकांना खडे बोल; मतपत्रिकेवर निवडणुकांची मागणी फेटाळली
नवी दिल्ली (बारामती झटका)
जिंकले की ओके, हरले की ओरड… अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी विरोधी पक्षांना खडे बोल सुनावले. ‘ईव्हीएम ‘ऐवजी मतपत्रिकांवर निवडणुका घेण्याची विनंती करणारी जनहित याचिका फेटाळून लावली.
न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती पी. बी. वराळे यांच्या खंडपीठाने हा निर्णय घेतला. डॉ. के. ए. पॉल यांनी ही याचिका दाखल केली होती.
चंद्राबाबू नायडू आणि वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्यासारख्या नेत्यांनीही इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनवर (ईव्हीएम) प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे. त्यावर खंडपीठ म्हणाले, जेव्हा चंद्राबाबू नायडू किंवा रेड्डी हरतात तेव्हा ते म्हणतात की, ‘ईव्हीएम’मध्ये छेडछाड आहे. जेव्हा ते जिंकतात तेव्हा काहीही बोलत नाहीत. ‘ईव्हीएम’मध्ये छेडछाड होत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट सांगितले.
याचिकेत होते हे २ मुद्दे…
‘ईव्हीएम’ ‘मध्ये छेडछाड केली जाऊ शकते, असे तज्ज्ञ सांगतात, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. त्यावर कुठल्याही तज्ज्ञाने ते सिद्ध केलेले नाही, असे न्यायालयाने नमूद केले.
एलॉन मस्क यांनीही ‘ईव्हीएम’ बद्दल साशंकता व्यक्त केलेली आहे. शंका खरी आहे, हे सिद्ध झाले पाहिजे, असे त्यावर न्यायालयाचे म्हणणे होते. मस्क यांनी अलीकडेच भारतातील पोटनिवडणुकांच्या मतमोजणीचे जाहीर कौतुक केले होते, हे येथे उल्लेखनीय !!
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.