ताज्या बातम्याराजकारण

करकंब येथील विठ्ठलराव शिंदे युनिट गुरसाळे येथील विठ्ठल कारखान्याचे कोणत्याही प्रकारचे देणे लागत नाही…

विधानसभा निवडणूक समोर ठेवून अभिजित पाटील यांचे खोटे आरोप – वामनराव उबाळे

बेंबळे (बारामती झटका)

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि. युनिट नं. 2 करकंब यांचेकडे विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि. गुरसाळे यांची 9 कोटी थकीत येणे बाकी असून विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे चेअरमन आ. बबनराव शिंदे यांनी सदर रक्कम विठ्ठल कारखान्याकडे परत करावी, अशी मागणी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे. केवळ आगामी विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून धादांत खोटा आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले आहे.

यामध्ये वस्तुस्थितीजन्य माहीती देताना वामनराव उबाळे म्हणाले की, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सोलापूर या बँकेने प्रतिभूती आणि वित्तीय मालमत्ताची पुनर्बांधणी आणि प्रतिभूत हिताच्या अंमलबजावणीचा कायदा, 2002 (सरफेसी कायदा 2002) अंतर्गत मे. शिवरत्न उद्योग अकलुज अंतर्गत विजय शुगर प्रा. लि. करकंब, ता. पंढरपूर, जि. सोलापूर यांची मालमत्ता विक्रीसाठी दैनिकामध्ये निविदा प्रसिध्द केलेली होती. या बँकेने थकीत कर्जासाठी विजय शुगर प्रा. लि. करकंब, ता. पंढरपूर, जि. सोलापूर या कारखान्याचा ताबा घेतलेला होता. बँकेने विजय शुगर कारखान्याचे चल अचल मालमत्ता विक्रीसाठी निश्चित केलेनुसार विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने लिलाव टेंडरमध्ये भाग घेवून मालमत्ता एकूण रू. 125.10 कोटीस खरेदी केलेली आहे. व विशेष म्हणजे बँकेने टेंडरमध्ये नमुद केलेल्या रिझर्व्हड किंमतीपेक्षा जादा रक्कम देवून खरेदी केलेला आहे. त्यामुळे विठ्ठल गुरसाळे कारखान्याची इतर कोणत्याही प्रकारची जुनी देणी देण्याचा आमचे विठ्ठलराव शिंदे युनिटचा संबंध नसून कायदेशीर नियमानुसार कोणत्याही प्रकारचे कुणाचेही देणे लागत नाही. विठ्ठलराव शिंदे कारखान्याने मे. शिवरत्न उद्योग अकलुज द्वारा विजय शुगर प्रा. लि. करकंब या कारखान्याची केवळ चल व अचल मालमत्ता खरेदी केलेली आहे. त्यामुळे आमचे कारखान्याचा विजय शुगर कारखान्याचे जुन्या देण्याशी कोणताही संबंध नाही. असे असताना अभिजीत पाटील यांनी खोटी वक्तव्य करुन शेतक-यांची दिशाभूल करणे योग्य नाही. याबाबत विठ्ठल कारखान्यास मा. साखर आयुक्त कार्यालयाकडून माहीती घेणेबाबत पत्रव्यवहार करणेत आलेला आहे. तथापि विजय शुगर बंद कालावधीमध्ये श्री विठ्ठल कारखान्याचे पुर्वीच्या संचालक मंडळाने सन 2016 साली 3 कोटी 74 लाख रूपये येणे रक्कमेसाठी शिवरत्न उद्योग समुह मे. विजय शुगर वरती पंढरपूर आणि वरीष्ठ न्यायालय मुंबई येथे दावा दाखल केला होता. अशा न्यायप्रविष्ठ प्रकरणाबद्दल आरोप करण्याऐवजी खोटी माहीती पुरवून केवळ जनतेची दिशाभूल करणेचा प्रयत्न करीत असून केवळ आगामी विधानसभा निवडणूक समोर ठेवून जनतेमध्ये चुकीच्या खोट्या पद्धतीने माहिती पाठवून गोंधळ व संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न अभिजित पाटील करीत आहेत. परंतू जनता त्याला भुलणार नाही, असे वामनभाऊ ऊबाळे यांनी स्पष्ट केले आहे.

तरी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यांनी केलेला आरोप धादांत खोटा असून केवळ विधानसभा निवडणूकीमध्ये आ.बबनदादा शिंदे व आगामी निवडणूकीत माढा मतदारसंघातून निवडणूक लढविणारे रणजितसिंह शिंदे यांच्या बाबतीत जनतेमध्ये एक संभ्रम निर्माण करण्याचा निष्फळ प्रयत्न अभिजीत पाटील करीत आहेत. माढा मतदारसंघात समाविष्ठ माढा, पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील समाविष्ठ असलेल्या एकूण १३४ गावातील जनतेला आ. बबनदादा शिंदे यांनी केलेली विकासकामे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून सतत विकासकामांचा ध्यास घेतलेले रणजितसिंह शिंदे यांचे कार्य माहीत आहे, असेही वामनराव उबाळे यांनी स्पष्ठ केले आहे. त्यामुळे विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या चलाखीच्या आणि खोट्या वक्तव्यावर माढा मतदारसंघातील जनता कधीही विश्वास ठेवणार नाही.

या पत्रकार परिषदेप्रसंगी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बंडूनाना ढवळे, कारखान्याचे संचालक सचिन देशमुख, कान्हापुरीचे सरपंच प्रेम चव्हाण यांचेसहीत अनेक मान्यवर उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button