खते, बियाण्यांचे ‘लिंकिंग’ करणाऱ्या विक्रेते कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (बारामती झटका)
राज्यातील शेतकरी, नागरिक यांना नैसर्गिक आपत्ती, शेती नुकसान भरपाईची मदत येत्या ३० जून पर्यंत पूर्ण करावी. तसेच खते, बियाणे यांचे लिंकिंग करणाऱ्या विक्रेत्यांबरोबरच कंपन्यांवरही कडक कारवाई करा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी विभागाच्या जिल्हा प्रशासनाला दिल्या. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असा विश्वास त्यांनी दिला आहे.
सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या बैठकीत राज्यातील खरिपाचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, कृषी मंत्री धनंजय मुंडे, पणन मंत्री अब्दुल सत्तार, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड, मुख्य सचिव डॉ. नितीन करीर आदी विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.

देशाचा कणा असलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी. राज्यात बांबू लागवडीवर भर द्यावा. कृषी विद्यापीठांनी नवीन संशोधनावर भर द्यावा. ज्या भागात २५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला, त्या तालुके, जिल्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. बोगस बियाणे कंपन्यावर कठोर कारवाई करावी. आपत्ती काळात शेतीच्या नुकसानीच्या पाहणीसाठी सॅटेलाईट तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले. कृषी अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय स्तरावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. हवामान विभागाने जुलै महिन्यात ला निना मुळे जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. अशा परिस्थितीत आपत्कालीन यंत्रणा सज्ज करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केल्या.

साठेबाजीविरोधात येथे करा तक्रार
खरिपाच्या काळात शेतकऱ्यांना खते-बियाणे, अन्य कृषी निविष्ठांचा तुटवडा भासू नये, यासाठी कृषी विभागाने परिपूर्ण नियोजन केल्याचा दावा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केला. साठेबाजी किंवा लिंकिंगच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी नोंदीसाठी व्हाट्सअपद्वारे ९८२२४४५५६६ या क्रमांकावर करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.


खते बियाणांचा साठा
यंदा खरिपाचे लागवडीखालील अपेक्षित क्षेत्र १४२.३८ लाख हेक्टर राहणार आहे. यात कापूस पिकाखाली ४०.२० लाख हेक्टर, सोयाबीन पिकाखाली ५०.८६ लाख हेक्टर, भात पिकाखाली १५.३० लाख हेक्टर, मका पिकाखाली ९.८० लाख हेक्टर, कडधान्य पिकाखाली १७.७३ लाख हेक्टर क्षेत्र येईल. राज्यात २४.९१ लाख बी बियाणे उपलब्ध आहेत तर, १.५० लाख मॅट्रिक टन युरिया व २५ हजार मेट्रिक टन डीएपी खतांचा संरक्षित साठा करण्यात आल्याची माहिती प्रधान सचिव राधा यांनी बैठकीत दिली.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.