मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी करणाऱ्या महिलेविरुद्ध साताऱ्यातल्या महिला आक्रमक

बदनामी करणाऱ्या महिलेला कडक शिक्षा करण्याची केली मागणी
सातारा (बारामती झटका)
महाराष्ट्राचे पंचायतराज आणि ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्यावर एक महिला जाणून-बुजून चिखल फेक करत असून, बदनामी करण्याचे काम करत आहे, त्या महिलेवर ताबडतोब कारवाई करून तिला अटक करावी, अशी मागणी आज साताऱ्यातील महिलांनी जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे केली.
माननीय मंत्री महोदय नामदार जयकुमार गोरे यांनी विधानसभेत स्पष्टपणे सांगितले आहे की, दोन हजार सोळा साली, सदर महिला ही याविषयी त्यांना ब्लॅकमेल करत होती आणि तिने त्यांच्या विरुद्ध कोर्टामध्ये केस सुद्धा केली होती, परंतु कोर्टाने जयकुमार गोरे यांची निर्दोष मुक्तता केली आहे, असे असूनही जवळजवळ दहा वर्षांनी पुन्हा एकदा या महिलेने मंत्री महोदयांची बदनामी करण्याचे काम सुरू केले आहे.
एक दोन न्यूज चॅनलला या महिलेने मुलाखत देऊन , माननीय जिल्हाधिकारी , माननीय पोलीस अधीक्षक यांना याबाबतीत निवेदने दिल्याचे सांगितले, याबाबतीत तक्रार आली असल्यास जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून त्याबद्दल काय निर्णय घेतला होता याचा सुद्धा खुलासा होणे आवश्यक आहे, कारण मंत्री महोदयांच्या बरोबरच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बद्दल सुद्धा या महिलेने बदनामीचे काम सुरू केले आहे.

साताऱ्यातील महिला मंत्री महोदय जयकुमार गोरे यांना खूप वर्षापासून ओळखत आहेत आणि त्यांच्याकडून अशी कोणतीच वाईट वागणूक मिळालेली नाही, जयकुमार गोरे महिलाना बहिणीप्रमाणेच मानतात. प्रत्येक ठिकाणी महिलांना सन्मानाचीच वागणूक मिळत असते, असे असतानाही एका चांगल्या व्यक्तीची नाहक बदनामी होत असेल तर ते समाजासाठी खूपच घातक आहे.
या महिलेमुळे इतर सर्वसामान्य महिलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्याचा धोका आहे, त्यांना घरातून बाहेर पडणे ही अशक्य होईल असे वाटायला लागले आहे. या एका महिलेमुळे समाजातील सर्व महिलाच बदनाम आहेत, असा समज होण्याची शक्यता असून त्यामुळे सर्व सामान्य घरातील महिला बदनाम होत आहेत.
जिल्हाधिकारी महोदयांनी या महिलेची सखोल चौकशी करावी, त्या महिलेने आजपर्यंत किती जणांना धोका दिला, ब्लॅकमेल केले कितीजणांकडून पैसे उकळले याची सुद्धा माहिती घ्यावी, आणि हे प्रकरण दहा वर्षांनी पुन्हा एकदा उकरून काढून मंत्री महोदयांची बदनामी करण्याच्या पाठीमागे कोण कोण आहेत, याचीही माहिती घेऊन या महिलेवर आणि तिला पाठिंबा देणाऱ्या किंवा तिला हे करण्यास प्रवृत्त करणाऱ्या सर्व घटकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी महिलांनी केली.

यावेळी सिद्धी पवार, रेणूताई येळगावकर, कविताताई कचरे, चित्रलेखाताई कदम, सुनिषा शहा, वैष्णवी कदम, वैशाली टंगसाळे, रिना भणगे, कुंजा खंदारे, सविता पवार, नयना कांबळे, उषा ओंबळे, कविताताई शिर्के, अंजली जाधव, सिमा घार्गे, रोहीणी क्षीरसागर, नंदा इंगवले, प्रिया नाईक, उज्ज्वला बर्गे, शितल कुलकर्णी, दैवशिला मोहिते, वैशाली मांढरे, सीता चव्हाण, मनिषा पांडे, अश्विनी हुबळीकर, निशा जाधव, संगिता जाधव आणि इतर अनेक महिला भगिनी उपस्थित होत्या.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.