आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रशासकीय मान्यतेसाठी सरपंचांची जिल्हा परिषदेत गर्दी

सोलापूर (बारामती झटका)
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण, ग्रामपंचायत विभागासह इतर विभागांतील कामांना प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी जिल्ह्यातील सरपंच, ठेकेदारांनी जिल्हा परिषदेत गर्दी केल्याचे चित्र दिसत होते.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहित येत्या पंधरा दिवसांत लागेल, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मोहोळ येथील कार्यक्रमात केले होते. त्यानंतर जिल्ह्यातील नेते, सरपंच आणि ठेकेदार सर्तक झाले आहेत.

सिमेंट काँक्रिट रस्ता, बंदिस्त गटारी, समाजकल्याण मंदिरासह इतर कामे मंजुरीसाठी जिल्हा परिषदेत ते गर्दी करत आहेत. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत, समाजकल्याण, स्वच्छता व पाणीपुरवठा विभागासह अनेक विभागांत हजारो कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आहे. ती कामे मंजूर करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती सदस्य, नेते, सरपंच आणि ठेकेदार वारंवार अधिकाऱ्यांकडे हेलपाटे मारत आहेत. अधिकारी हे पालकमंत्री, आमदारांच्या याद्या प्राधान्याने मंजूर करत आहेत.
अधिकाऱ्यांची होणार कोंडी
जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हा परिषदेच्या सेसफंडाचा निधी हा पालकमंत्री, आमदार यांच्या शिफारशींशिवाय जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना मिळावा, अशी मागणी सरपंच परिषदेने केली आहे. पालकमंत्र्यांनी खासदार, आमदारांच्या आदेशानेच जिल्हा परिषदेतील सर्व निधीचे वितरण करावे, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची कोंडी होणार आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.