मानवाधिकार दिनानिमित्त सकल हिंदू समाज बांधव तहसीलदारांना निवेदन देणार…

माळशिरस (बारामती झटका)
१० डिसेंबर २०२४ रोजी मानवाधिकार दिनाच्या निमित्ताने, महाराष्ट्रातील सर्व तहसील कार्यालयांमध्ये मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या वतीने निवेदन सादर करण्यात येणार आहे, हे निवेदन बांग्लादेशातील हिंदू अल्पसंख्यांक समाजावर होणाऱ्या अन्याय, अत्याचार, धार्मिक दडपशाही आणि त्यांच्या मौलिक हक्कांवरील हल्ल्यांविरोधात आहे.
बांगलादेशातील हिंदू समाज गेल्या काही दशकांपासून धार्मिक हिंसा, मालमत्तेच्या जबरदस्तीने बळकावणी, मंदिरांच्या तोडफोडी तसेच जबरदस्ती धर्मांतरासारख्या घटना सहन करत आहे. या समुदायाच्या मानवाधिकारांचे उल्लंघन करून त्यांना त्यांच्या देशात असुरक्षिततेच्या गर्तेत ढकलले जात आहे. अल्पसंख्यांक समुदायावर होत असलेल्या या अत्याचारांना आंतरराष्ट्रीय स्तरावर वाचा फोडणे आणि पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी ठोस उपाययोजना राबवणे ही काळाची गरज आहे.
कार्यक्रमाचे स्वरूप –
१० डिसेंबर २०२४ रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक तहसील कार्यालयात मानवाधिकार कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटना एकत्र येऊन तहसीलदारांना निवेदन सादर करतील. निवेदनाद्वारे बांग्लादेशातील हिंदूंच्या हक्कांचे संरक्षण आणि भारत सरकारच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दबाव वाढवण्याची मागणी केली जाईल, प्रत्येक तहसील कार्यालयात कार्यक्रम शांततेने पार पाडला जाईल आणि सहभागी नागरिक काळ्या फिती (Black Ribbon) बांधून निषेध नोंदवतील.
निवेदनातील मुख्य मागण्या –
१) बांग्लादेशातील हिंदूच्या जीवित, संपत्ती आणि धार्मिक स्थळांचे संरक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ठोस पावले उचलणे.
२) बांग्लादेश सरकारला अल्पसंख्यांकांच्या हक्कांचे रक्षण करण्यास भाग पाडण्यासाठी जागतिक दबाव निर्माण करणे. भारत सरकारने या प्रश्नाला आंतरराष्ट्रीय पटलावर नेऊन तातडीने प्रभावी उपाययोजना सुरू कराव्यात.
३) अत्याचारग्रस्त हिंदूंना संरक्षण व समर्थन देण्यासाठी विशेष धोरण आखणे.
कार्यक्रमाचे उद्दिष्ट –
अत्याचाराविरोधात जनजागृती करणे, सरकार आणि आंतरराष्ट्रीय संस्थांना या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्यास भाग पाडणे. पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुचवणे.
मानवतेसाठी आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी एकत्र उभे राहण्याची ही योग्य वेळ आहे. १० डिसेंबर २०२४ रोजी मानवाधिकार दिनाच्या निमित्ताने, महाराष्ट्रातील सर्व तहसील कार्यालयांमध्ये मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या वतीने निवेदन सादर करण्यात येणार आहे. आपल्या उपस्थितीने हा लढा अधिक प्रभावी होईल आणि आपल्या आवाजाने मानवतेसाठी सकारात्मक बदल घडवून आणता येईल. हे आंदोलन मारुती मंदिर ते तहसील कार्यालय माळशिरस येथे करण्यात येणार आहे. त्यामुळे यावेळी जास्तीत जास्त संख्येने सकल हिंदू समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सचिन पिसे (मो. ८००७७७६५४५) यांच्यावतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.