ताज्या बातम्याशैक्षणिक

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर – डॉ. आबासाहेब देशमुख

बार्शी (बारामती झटका)

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबरच व्यवसाय शिक्षण, कौशल्य विकास, नेतृत्व विकास, मूल्यशिक्षण, उद्योजकता, कार्यानुभव, प्रशिक्षण, ऑन-दि-जॉब ट्रेनिंग, प्रात्यक्षिके, प्रोजेक्ट वर्क, ऑनलाइन एज्युकेशन इत्यादींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आलेला आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघाचे अध्यक्ष व अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. आबासाहेब देशमुख यांनी केले. बार्शी येथील एम. आय. टी. कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग अँड रिसर्च तर्फे आयोजित एज्युकेशन समिट ऑन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी २०२० च्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुकर लेंगरे यांनी प्रस्तावित केले तर, कार्यक्रमाचे उद्घघाटन प्राचार्य डॉ. आबासाहेब देशमुख, श्री. वेंकटेश गंभीर, डॉ. श्रीकांत कलुरकर व प्राचार्य डॉ. मधुकर लेंगरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची ध्येय व उद्दिष्टे तसेच राष्ट्रीय पातळीवरील शिक्षण संस्थांची नवीन संरचना, देशातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांना समान शैक्षणिक धोरण व समान आराखडा, संशोधन व विकासाला चालना, औद्योगीकरण, व्यवसाय व उद्योगधंद्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करणे, व्यवसाय शिक्षण, कौशल्य विकास व मूल्य शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा परिपूर्ण विकास करणे व त्याची सर्वांगीण जडणघडण करून त्याला स्वावलंबी बनवणे इत्यादी महत्त्वाचे उद्दिष्ट या नवीन शैक्षणिक पद्धतीमध्ये ठेवण्यात आलेली असून याद्वारे भारत देश ग्लोबल नॉलेज सुपर पावर (विश्वगुरु) बनवणे हे या शैक्षणिक धोरणाचे अंतिम उद्दिष्ट ठरविण्यात आलेले आहे. हे धोरण राबविताना संस्था, महाविद्यालये, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच पालकांनाही अनेक अडचणीला सामोरे जावे लागणार आहे. परंतु हळूहळू शासनाच्या माध्यमातून आलेल्या अडचणी दूर करून हे शैक्षणिक धोरण यशस्वीरित्या राबवणे ही काळाची गरज आहे, असेही ते पुढे म्हणाले.

या कार्यक्रमात टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई या संस्थेचे सेवानिवृत्त वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. व्यंकटेश गंभीर, पुणे येथील लेवल अप संस्थेचे संचालक डॉ. श्रीकांत कल्लूरकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुकर लेंगरे यांनीही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण संबंधी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास जे. एस. पी. एम. संस्थेच्या भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्रमुख संचालक श्री. ऋतुराज सावंत व याच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रणजीत शिराळ, माढा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील हेलकर, बार्शी येथील बी. एड. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रेय कदम, कार्यक्रमाचे संयोजक डॉ. रत्नाकर साखरे, कार्यक्रम समन्वयक डॉ. संजय माने व श्री. विठ्ठल जगताप तसेच विविध विद्यापीठातील विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयाचे २०० पेक्षा अधिक संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button