राज्य शासन दुष्काळग्रस्त भागाला पाणीदार करून सिंचन वाढवण्यासाठी कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाऊलखुणा असतील त्या ठिकाणचा शासन विकास करणार…
सांगोला येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी 50 लाखाच्या निधीची घोषणा…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आरोग्य शिबिराला भेट…
सांगोला (बारामती झटका)
राज्य शासन दुष्काळग्रस्त भाग पाणीदार करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विविध जलसंधारणाची कामे राबवत आहे. दुष्काळग्रस्त भागाला पाणी उपलब्ध करणे व सिंचन क्षमता वाढवणे यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
सांगोला येथे आयोजित भीमसैनिकांनी उभारलेल्या निधीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे तसेच माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या आमदार निधीतून साकारण्यात आलेल्या भव्य स्मारकाच्या अनावरण प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करत होते.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, पर्यटन विकास मंत्री शंभूराज देसाई, माजी आमदार शहाजीबापू पाटील, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार समाधान आवताडे यांच्या शुभहस्ते व आमदार राजू खरे, माजी आमदार दीपकआबा साळुंखे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सांगोला येथील परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
उपमुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले, शासनाने मंत्रिमंडळ बैठकीत म्हैसाळ उपसा सिंचन योजना व सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी 3 हजार कोटीच्या निधीला मान्यता दिलेली आहे. ताकारी व म्हैसाळ या दोन स्वतंत्र उपसा सिंचन योजना आहेत. सांगोला तालुक्याला देखील सिंचनासाठी पाणी उपलब्ध करण्यात येणार आहे. शासन दुष्काळग्रस्त भागाला पाणीदार करून त्या भागातील सिंचन क्षमता वाढवून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

महायुतीच्या शासनाचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श विचारावर चालत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला जे संविधान दिलेले आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळत आहे. जिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाऊलखुणा आहेत तो भाग शासनाच्या वतीने विकसित करण्यात येत असून, त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे. आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असेही त्यांनी सांगितले.
सांगोला तालुक्याच्या विकासासाठी भरघोस निधी देण्यात आलेला असून पुढील काळातही सांगोला तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू दिल्या जाणार नसल्याचे त्यांनी सांगून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी 50 लाखाचा निधी देत असल्याची घोषणा त्यांनी केली. तसेच सांगोला येथील एमआयडीसी साठी जागा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करण्यात येतील असेही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांच्या या स्मारकातून आपण बाबासाहेबांचे विचार समता, स्वातंत्र्य व बंधुता हे सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. शासन समाजातील सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असून सांगोला तालुक्याचाही विकास करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री जयकुमार गोरे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई या मान्यवरांच्या हस्ते सांगोला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व त्यांचे भव्य स्मारक या अनुषंगाने प्रस्ताविक केले. या कार्यक्रमास हजारो भीमसैनिक उपस्थित होते.

आरोग्य शिबिर
सांगोला येथे आयोजित आरोग्य शिबिराला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन ते पुढे म्हणाले की, गेल्या अडीच वर्षात शासनाकडून मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवेचे काम केले असून, मुख्यमंत्री सहायता निधीतून 450 कोटी रुपये देण्यात आले. राज्यात हजारो रुग्णांचे प्राण वाचवण्याचे काम या मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून केले. काही आजारावरील उपचाराचा खर्च सामान्य कुटुंबांना परवडणारे नसतात. सामान्य कुटुंबातील नागरिकांना मोठ्या आजारावरती तात्काळ उपचार मिळावेत यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेची मर्यादा दीड लाख रुपयांपर्यंत होती, त्याची शासनाने मर्यादा वाढवून पाच लाख रुपये पर्यंत केली आहे. तसेच त्यामधील अटी शर्ती देखील कमी करण्यात आल्या आहेत. राज्यातील साडेबारा कोटी जनतेला यातून आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे.
सद्यस्थितीत उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्याने उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. यासाठी नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.