राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; या जिल्ह्यांना यलो अलर्ट

पुणे (बारामती झटका)
विदर्भातील काही भागांतील कमाल तापमानाचा पारा काहीसा उतरला असून, सोमवारी (दि. २८) अमरावती, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
या भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ५० ते ६० कि.मी. वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सात जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, मध्य महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. राज्यात मध्य महाराष्ट्रातील काही भागांसह मराठवाड्यातील कमाल तापमानात १ ते २ अंश सेल्सिअसने घट झाली.
मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, नाशिक, सांगली, सातारा तसेच सोलापूरसह विदर्भात नागपूर, गोंदिया, वर्धा आणि यवतमाळ भागातील तापमानाचा पारा उतरला आहे. मराठवाड्यात धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि बीडने तापमानाची चाळिशी ओलांडली आहे. पुण्यातील लोहगाव येथे ४२.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. पुढील दोन दिवसांत परभणी व हिंगोलीमधील तुरळक ठिकाणी हवामान उष्ण व दमट राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.