सीना-माढा उपसासिंचन योजनेतून तातडीने पाणी सोडावे – चेअरमन रणजितसिंह शिंदे

कार्यक्षेत्रातील तलाव, ओढे, नाले व बंधारे पूर्ण क्षमतेने भरण्याची मागणी
माढा (बारामती झटका)
सध्या उजनी धरणात 70 टक्क्यांच्या आसपास उपयुक्त पाणीसाठा आहे. शिवाय पुणे जिल्हा व धरणक्षेत्रात पाऊसही चांगला पडतोय. ही बाब लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने माढा तालुक्यातील अनेक गावांसाठी वरदायिनी ठरलेल्या सीना-माढा उपसासिंचन योजनेतून तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह बबनराव शिंदे यांनी केली आहे.
पुढे अधिक माहिती देताना चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी सांगितले की, यापूर्वी धरणात 25 टक्के जरी पाणीसाठा उपलब्ध झाला तरी तत्कालीन आमदार बबनदादा शिंदे हे शासन दरबारी प्रयत्न व पाठपुरावा करून सीना-माढा उपसासिंचन योजनेतून पाणी सोडून या योजनेच्या कार्यक्षेत्रातील गावातील सर्व तलाव, ओढे, नाले व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून घेत होते. परंतु, सध्या उजनी धरणात 70 टक्क्यांच्या आसपास उपयुक्त पाणीसाठा आहे. तरीही सीना-माढा उपसासिंचन योजनेतून पाणी सोडले नाही ही वस्तुस्थिती असून ही बाब शेतक-यांच्या दृष्टीने चिंताजनक आहे. या योजनेतून पाणी सोडण्यासाठी खूपच विलंब झाला आहे तरीही नेमकी कशाची वाट पाहिली जात आहे ?, हा गंभीर प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. माढा तालुक्याच्या काही भागात मे व जून महिन्यात समाधानकारक पाऊस पडला आहे. परंतु, काही भागात पाऊस खूपच कमी पडला आहे. आजही काही गावातील तलाव व बंधारे अक्षरशः कोरडे ठणठणीत आहेत. विशेषत: तालुक्याच्या दक्षिण भागातील मोडनिंब, लऊळ, उपळाई बुद्रुक, उपळाई खुर्द, विठ्ठलवाडी आदी गावात पाऊस कमी पडला आहे. या भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर खरीपाच्या पेरण्या व फळबागा लागवड केलेली आहे. तेव्हा शेतातील या पिकांसाठी व फळबागांचे संगोपन करण्यासाठी सीना-माढा उपसासिंचन योजनेतून तातडीने पाणी सोडून या भागातील सर्व पाझर व साठवण तलाव, ओढे, नाले व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून घ्यावेत जेणेकरून पिके व फळबागांचे संगोपन होईल. या भागातील भूजलपातळी वाढण्यास मदत होईल शिवाय जे पाणी भीमा व सीना नदीतून अनावश्यक रितीने सध्या वाया जात आहे, त्याचाही सदुपयोग होईल. या भागातील शेतकरी पावसाची सध्या चातकाप्रमाणे वाट पाहत आहे परंतु, वरूणराजा बरसत नाही. तेव्हा तातडीने सीना-माढा उपसासिंचन योजनेतून पाणी सोडावे अशी मागणी रणजितसिंह शिंदे यांनी केली आहे.
विद्यमान लोकप्रतिनिधींच्या अतिरेकी हस्तक्षेपामुळे व अयोग्य नियोजनामुळे उन्हाळी आवर्तनातील सीना-माढा उपसासिंचन योजनेचे पाणी या कार्यक्षेत्रातील अनेक गावांना मिळालेच नव्हते. शिवाय सध्या या भागात पाऊसही अपेक्षेप्रमाणे पडला नाही. या भागातील तलाव, ओढे, नाले व बंधारे अक्षरशः कोरडे ठणठणीत आहेत. त्यामुळे शेतातील उभी पिके व फळबागांचे संगोपन करण्यासाठी पाण्याची नितांत गरज आहे. या भागातील शेतकऱ्यांचीही मागील काही दिवसांपासून पाणी सोडण्याची मागणी आहे तेव्हा शासनाने तातडीने सीना-माढा उपसासिंचन योजनेतून पाणी सोडून शेतकऱ्यांना दिलासा द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे समाजकल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे यांनी जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्याकडे केली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.