स्नेहा बारवे यांच्यावरील हल्ल्याचा इंदापूरात पत्रकारांनी नोंदवला जाहीर निषेध…

महाराष्ट्र राज्य जनसेवा पत्रकार संघाकडून तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन; कठोर कारवाईची केली मागणी.
इंदापूर (बारामती झटका) शिवाजी पवार यांजकडून
दै. समर्थ भारतच्या संपादिका स्नेहा बारवे आणि त्यांचे सहकारी पत्रकार समीर राजे यांना मंचर येथील एका बिल्डरने आणि त्याच्या नातेवाईकांनी अश्लील शिवीगाळ व धक्काबुक्की करत मारहाण केली असून याबाबत पोलिसांत तक्रार दिल्यास या गुंडांनी पत्रकार स्नेहा बारवे आणि समीर राजे यांना ठार मारण्याची धमकी देखील दिली आहे. या घटनेने पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून आंबेगाव तालुक्यात बीडच्या
मस्साजोगची पुनरावृत्ती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मंचर शहरातील एस कॉर्नर परिसरात असणाऱ्या नाविन्य रेसिडेन्सी या इमारतीच्या डेव्हलपरने त्याच्या अनधिकृत बांधकामाच्या तक्रारी केल्याचा संशय, मीटरमधे हेराफेरी, बायपास, वीज चोरी आदी गोष्टी करत असल्याचे चित्रीकरण केल्याचा संशय, तसेच नाविन्य रेसिडेन्सी या इमारतीमधील फ्लॅटची विक्री करून सदर ठिकाणी सोसायटीची नोंदणी न करता सदनिका धारकांची फसवणूक होत असून, ही फसवणूक संबंधित पत्रकार उघड करतात की काय ? असा संशय मनात ठेवून संतापून सदर मुजोर बिल्डर यांनी स्नेहा बारवे यांना अश्लील शिवीगाळ, धक्काबुक्की करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. घटने दरम्यान इसमाने पत्रकार स्नेहा बारवे यांना मारहाण करण्याचाही प्रयत्न केला. या प्रयत्नात पत्रकार स्नेहा बारवे यांच्या हातावर जोरात फटका देखील बसला आहे.
संपादिका स्नेहा बारवे यांच्यावरील झालेल्या भ्याड हल्ल्याचा महाराष्ट्र राज्य जनसेवा पत्रकार संघटना, इंदापूर तालुका जनसेवा पत्रकार संघाकडून जाहीर निषेध नोंदविण्यात आला आहे. इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे तसेच इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी इंदापूर जनसेवा पत्रकार संघाकडून करण्यात आली आहे.

यावेळी महाराष्ट्र राज्य जनसेवा पत्रकार संघटनेचे इंदापूर तालुकाध्यक्ष पत्रकार शिवाजी पवार, अतुल सोनकांबळे, महेश गडदे, अशोक घोडके, दत्तात्रय मिसाळ, सत्यजित रनवरे, दत्ता पारेकर, संजय शिंदे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्रामध्ये पत्रकारांवर सतत होत असलेले हल्ले यावर शासन गंभीर दिसत नाही, याबाबत शासनाने ठोस पाऊल उचलावे, जेणेकरून पत्रकारांवर होणारे हल्ले थांबतील. पत्रकार हा समाजाचा आरसा आहे, समाजाचे प्रश्न मांडत असताना काही गाव गुंडांकडून पत्रकारांवर हल्ले केले जातात. अशा घटनांना आळा घालण्यासाठी शासनाने कडक कारवाई करणे गरजेचे आहे. – शिवाजी पवार, अध्यक्ष, जनसेवा पत्रकार संघटना इंदापूर तालुका
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.