पुणे (बारामती झटका)
अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईमध्ये काही गुळ उत्पादक चुकीच्या मार्गाने गुळ उत्पादन करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. नागरिकास उत्तम दर्जाचा गुळ मिळावा व गुळ उत्पादकांनी चांगल्या दर्जाचे गुळ उत्पादन कशा रितीने करावे याबाबत अन्न व औषध प्रशासनातर्फे दि. 26 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11 वा. बालाजी मंगल कार्यालय, हांडाळवाडी, म्हसोबा चौक, केडगाव ता. दौंड, जिल्हा पुणे या ठिकाणी कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सह आयुक्त (अन्न) शिवाजी देसाई यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2009, हा महाराष्ट्रासह संपूर्ण देशात दि. 5 ऑगस्ट 2011 पासुन लागु झालेला असुन या कायद्याचा प्रमुख उद्देश नागरिकांना सुरक्षित, सकस व निर्मळ अन्न पदार्थ उपलब्ध करुन देणे हा आहे. या कार्यशाळेमध्ये मार्क लॅब पुणे येथील डॉ. वसुधा केसकर व अन्न व औषध प्रशासनाचे विधी अधिकारी संपतराव देशमुख हे अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 नियमने 2011 अंतर्गत व प्रचलित व अदयावत गुळ उत्पादनाविषयी मार्गदर्शन करणार आहेत.
तरी सदर दिवशी पुणे जिल्हयातील सर्व गुऱ्हाळ व्यवसायिकांनी मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व व्यवसायासाठी आवश्यक परवाने घेवूनच व्यवसाय करावा. यानंतरही संबंधितांनी परवाने घेतले नसल्याचे आढळल्यास त्यांच्या विरुध्द कायदयातंर्गत तरतुदीनुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सह आयुक्त (अन्न) श्री. देसाई यांनी कळविले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng