सोलापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आयुक्तांचे आश्वासन.
पुणे (बारामती झटका)
आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिष्टमंडळ सोलापूर जिल्ह्यातील श्री शंकर सहकारी, श्री विठ्ठल सहकारी, श्री भीमा सहकारी, सहकार शिरोमणी, संत दामाजी यांच्यासह इतर कारखान्यांच्या एफ आर पी, कामगारांच्या पगारी, ऊस वाहतूक बिले यांच्यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन शेखर गायकवाड, साखर आयुक्त, पुणे यांची भेट घेतली. ज्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची ऊस बिले (FRP) संपूर्णपणे दिले आहेत, अशाच साखर कारखान्यांना गाळप परवाना द्यावा. काही कारखाने करार करून चार टप्प्यात एफ आर पी देणार असल्याचे सांगत आहेत व काही कारखानदार एफआरपी दिल्याची खोटी माहिती देत आहेत. अशा सर्व कारखान्यांची सखोल चौकशी करून जोपर्यंत त्यांची 100% एफआरपी पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्यांना गाळप परवाना देऊ नये.
जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांनी सर्वसाधारण सभेमधून सभासद, काही सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, त्या सभासदांचे सभासदत्व कायम राहावे, काही कारखानदार काटा मारी, रिकव्हरी कमी दाखवणे असे प्रकार करत आहेत, त्याच्यामध्ये लक्ष घालावे, कारखान्याच्या सर्वसाधारण सभा ऑनलाईनच्या ऐवजी पूर्वीप्रमाणे ऑफलाईन घ्यावेत, या मागण्या घेऊन स्वाभिमानीचे सोलापूर जिल्ह्यातील शिष्ट मंडळ गेले होते. यावेळी युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, पंढरपूर तालुका अध्यक्ष सचिन पाटील, जिल्हा संघटक शहाजन शेख, माळशिरस तालुका अध्यक्ष अजित बोरकर, तालुका युवा अध्यक्ष अमर इंगळे, करमाळा तालुका उपाध्यक्ष तानाजी शिंदे, अतुल पिसे आदी उपस्थित होते. यावेळेस साखर आयुक्तांनी सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार करून जे कारखाने दि. १५ ऑक्टोबरच्या अगोदर 100% एफ आर पी देतील त्यांनाच गाळप परवाना देऊ, तसेच इतर विषयांसाठी लवकरच पंढरपूर येथे साखर आयुक्त व स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांची बैठक घेण्याचे आश्वासन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng