महसूल प्रशासनाने लक्ष देऊन या रस्त्याचे काम पूर्ण करावे. अशी ग्रामस्थांची मागणी
कोथळे (बारामती झटका)
कोथळे, शास्त्रीनगर (ता. माळशिरस) येथील ५० लोकसंख्या असलेल्या वस्तीला आजही रस्ता प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. येथे गट न. ४७४ व गायरान क्षेत्रामध्ये शासनाने घरकुले बांधून दिले आहेत. मात्र, या वस्तीकडे जाणारा रस्ता चिखलात राहिला आहे. शेतकऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे हा रस्ता रखडला आहे. महसूल प्रशासनाने लक्ष देऊन या रस्त्याचे काम पूर्ण करावे. अशी मागणी वस्तीच्या वतीने होत आहे.
रस्त्याच्या गैरसोयीमुळे गावापासून दूर राहिलेल्या या मंडळींना आजही दळणवळणाच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पावसाळ्यात शाळकरी मुले आणि महिलांना चिखल तुडवत जावे लागते. गर्भवती महिला व वयोवृद्ध लोकांना वस्तीमधून बाहेर पडणे अवघड होते आहे. शेतात ट्रॅक्टर, बैलगाडी आणणे, बि बियाणे आणणे, खत आणणे, याची अत्यंत गैरसोय होत आहे.

स्वतः ची वाहने दुसऱ्या वस्तीवर लावली लागतात व शेतात पिकलेला माल बाजारपेठेत वेळेवर जात नाही.
या वस्तीतील लोकांना उर्वरित जगाशी संपर्क साधायचा असल्यास, ओढ्या, नाल्यातून वाट शोधावी लागत असल्याचे भयानक वास्तव आहे. गेल्या ६० वर्षात जिथे रस्ताच नाही, तिथे विकासाच्या कल्पना न केलेल्याच बऱ्या. आजवर अनेक स्थानिक नेत्यांनी निवडणुकीवेळी वस्तीतील लोकांना रस्त्याची आश्वासने दिली. परंतु निवडणुकीच्या गुलालासोबत हि आश्वासन वाहून गेल्याचे दिसत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष केंद्रित करून रस्त्याच्या प्रश्न वेळेवर सोडवावा व रस्ता दळणवळणासाठी खुला करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दळणवळणाची सोय नसल्याने दूध डेअरी घरापर्यंत येत नाही, दुधाची किटली रोज १ कि.मी. डोक्यावर घेऊन जावे लागते. गाईचे खाद्य, पोती घरी आणता येत नाहीत. – महादेव माने (शेतकरी)
शाळेत जाण्यासाठी वडिलांना सायकल खरेदी करायला लावली मात्र, रस्त्या नसल्याने सायकल घरीच ठेवून शाळेत चालत जावे लागले. – आकाश माने, विद्यार्थी
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng