सोलापूर (बारामती झटका)
आज राज्यात मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी सुरू आहे. मराठवाड्यातील जवळपास सर्वच नद्यांना पूर आला आहे. सर्व धरणांनी धोक्याची रेषा ओलांडली असुन जिकडेतिकडे सर्वत्र पाणी आहे. यामध्ये मराठवाडय़ातील शेतकऱ्यांचं सोयाबीन आणि कपाशी पुर्णपणे हातुन गेलं आहे. अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे. आज मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या शेतीसोबतच डोळ्यांमध्येही पाणी आहे. अश्रुंनी भरलेले डोळे घराघरात दिसतील. मात्र, मराठवाडयात परळीत काल एका कार्यक्रमात राज्याचे मातब्बर अन् सत्ताधारी असणाऱ्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांचा संवाद कार्यक्रम पाहिला. तिथलं त्यांचं जंगी स्वागत.. तो रूबाब आणि तो अफाट खर्च, मिरवणूक, हारतुरे सगळंच कसं टेचात..
राज्यात स्वतःची सुसंस्कृत जबाबदार व संवेदनशील नेता म्हणुन स्वतः वेगळी ओळख निर्माण करणार्या जयंतरावांना काल सत्कार अन् हारतुरे यांच्या डौलाच्या धुंदीत त्याच मराठवाडय़ाच्या शेतकऱ्यांची अतिवृष्टीने झालेली दैना दिसली नसेल का ? सत्तेची धुंदी इतकीही डोक्यात जावु द्यायची नसते मंत्री महोदय, आपण राज्यात एक संवेदनशील नेतृत्व म्हणुन आपले कार्यकर्ते राज्यभर ऊर बडवुन सांगतात आणि तिच संवेदनशीलता तुम्ही आपल्या सत्तेच्या अन् पदाच्या रूबाबात पायदळी तुडवता. जयंतराव, निदान लोकांना मदत देणं जमणार नसेल तर त्यांच्या जखमेवर मीठ तरी चोळु नका.
आज होत असलेल्या नुकसानीचं मोल हे अगणित प्रमाणात आहे, घरंदारं उध्वस्त होत आहेत, शेतकऱ्यांना शेवटी सरकारी मदतीशिवाय पर्याय नाही. मदत मिळेल ही सरकारकडून. पण तिथ त्यांच्याच भागात जावुन त्यांच्याच समोर तुम्ही आपलाच उदोउदो करत तिथल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रूंचे मुल्य मातीमोल करु नका. अन्यथा इथला शेतकरी देखील मागच्यांप्रमाणे तुमचा देखील “करेक्ट कार्यक्रम” केल्याशिवाय राहणार नाही…
रणजित बागल
राज्य प्रवक्ता, स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडी
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng