निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केल्याने जुलै महिन्यापासून निवडणूका सुरु होण्याची शक्यता.
माळशिरस ( बारामती झटका)
ओबीसी आरक्षणामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या निवडणुकींचा आता धुरळा उडणार असून राज्यातील २५ जिल्हा परिषदाचा गत आणि गण रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती गट आणि गण रचनेचे प्रारूप दि. 23/05/2022 रोजी आयुक्ताकडे पाठवणे, प्रारूप आराखड्यास आयुक्तांची मजुरी दि. 31/05/2022, प्रारूप गट, गण रचना प्रसिद्धी दि. 02/06/2022, प्रारूप रचनेवर आक्षेप दि. 08/06/2022 आलेल्या आक्षेप, हरकतीवर सुनावणी घेऊन अंतिम स्वरूप देणे दि. 22/06/2022 आणि अंतिम गट, गण रचनेची प्रसिद्धी दि. 27/06/2022 रोजी होणार आहे.
राज्यात गेल्या काही महिन्यांपासून वाजत गाजत असलेल्या स्थानिक स्वराज्य निवडणुका आता लवकरच होत असून सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर या निवडणुकांना आता गती आली असून निवडणूक आयोगाने आता या निवडणूकींची तयारी सुरु केली आहे. ओबीसी आरक्षणासाठी या निवडणुका खोळंबल्या होत्या. ओबीसी आरक्षणासह या निवडणुका घेता याव्या म्हणून राज्य शासनाने या निवडणूका पुढे ढकलल्या होत्या. परंतु सर्वोच्च न्यायालयाने याबाबत निकाल दिला असून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत. ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका हा विषय देखील राजकारणाचा बनला गेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार या निवडणुका आता लवकरच होणार असल्याचे याआधीच स्पष्ट झालेले असताना आता निवडणूक आयॊगाने निवडणूक घेण्याची लगबग सुरु देखील केली आहे.
राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या गट आणि गण रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे या निवडणुकीस आता गती येऊ लागली आहे. नगरपालिकांसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या गट आणि गण रचनेचा कार्यक्रम निश्चित केला आहे. जून महिन्याच्या अखेरीपर्यंत संपूर्ण गट आणि गण रचना पूर्ण होणार आहे. त्यामुळे पुढील महिन्यात या निवडणुकीचा एक टप्पा पूर्णत्वास येणार आहे.
या जिल्हा परिषद निवडणुका
राज्यातील एकूण २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत असून सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे.
दोन टप्प्यात निवडणूक
राज्यात एकूण १४ महापालिका आणि २५ जिल्हा परिषद यांच्या निवडणुका होत आहेत. दोन वर्षानंतर एकत्र या निवडणूका होत असून सर्व निवडणुका एकाच वेळी घेणे अडचणीचे असल्यामुळे सदर निवडणुका या दोन टप्प्यात घेण्याची तयारी निवडणूक आयोग करीत असल्याची माहिती आहे. निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केल्याने जुलै महिन्यापासूनच निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे इच्छुक उमेदवार पुन्हा जोमाने कामाला लागलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng