पंढरपूर (बारामती झटका)
एकीकडे पंढरपूर तालुक्यातील संपूर्ण कारखानदारी अडचणीत आली असताना आज श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमाप्रसंगी कारखान्याचे चेअरमन श्री. प्रशांत परिचारक यांनी जे प्रतिपादन केले आहे ते खरोखरच स्वागतार्ह असे आहे. आज तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा श्री विठ्ठल सहकारी बंद आहे, भीमा सहकारी बंद आहे तसेच चंद्रभागा सहकारी देखील मोठ्या मुश्किलीने सुरू होणार आहे, ही सर्व परिस्थिती पाहता आज पांडुरंग वगळता इतर कारखान्याचे सभासद ऊस कुठे पाठवायचा या विवंचनेत आहेत. अशा परिस्थितीत श्री. परिचारक यांनी तालुक्यातील सर्व शेतकरी कोणत्याही कारखान्याचे असले तरीही शेतकरी म्हणून त्यांना पांडुरंगकडून न्याय दिला जाईल व त्यांचा ऊस नेला जाईल अशी भूमिका जाहीर केली ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष तानाजीराव बागल यावेळी बोलताना म्हणाले.
पांडुरंग कारखान्याने वेळोवेळी आम्ही ऊसदर आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांनी ऊस दराची कोंडी फोडण्याचे काम केले. आम्ही शेट्टी साहेब यांच्या आदेशानुसार त्यांच्याकडे चर्चेला जायचो आणि ते मार्ग काढत असत. आज प्रशांत परिचारक यांनी देखील अशाच प्रकारची भूमिका घेत स्वर्गीय सुधाकरपंत यांच्या पावलावर पाऊल ठेवले आहे आणि शेतकऱ्यांना राजकारणाच्या पलीकडे जाऊन आधार देण्याचे काम केल्याबद्दल मी त्यांचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जाहीर आभार मानतो. येत्या काळात उसाला दर देऊन आणखी शेतकऱ्यांच्या पदरात चार पैसे टाकावेत, अशी देखील यानिमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो असेही पुढे बोलताना बागल म्हणाले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng