अकलूज (बारामती झटका)
बाभूळगाव ता. माळशिरस येथे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ विविध मागण्यांसाठी दि. ८ मार्च २०२२ रोजी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी माळशिरस उपविभाग अकलुज यांना देण्यात आले आहे.
सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, दि. २/३/२०२२ रोजी बाभुळगाव येथील वंचित बहुजन आघाडीचे माळशिरस तालुका संघटक विकास दळवी, बाभुळगाव शाखेचे खजिनदार अमोल कांबळे व महादेव दळवी यांच्यावर जातीयवादी गावगुंडांनी केवळ ग्रामपंचायतीमध्ये निवेदन दिले म्हणून जीवघेणा हल्ला केला आहे. हल्ल्यानंतरही जखमींवर परत हल्ला करण्यासाठी हल्लेखोर बाहेर चौकात थांबले होते. अशावेळी पोलिसांची गाडी तेथे पाठवून जखमींना पोलीस संरक्षणात अकलूज मध्ये उपचारासाठी आणण्यात आले. इतके गंभीर प्रकरण असतानाही अद्यापपर्यंत आरोपींना अटक झाली नसल्याने तेथील समाज दहशतीखाली असून प्रशासकीय यंत्रणाकडूनही घटनास्थळी भेटी देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे ढिम्म प्रशासनाला जागे करण्यासाठी आरोपींना अटक करून, त्यांच्यावर त्वरित हद्दपारीची कारवाई करण्यासाठी, आरोपींची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करण्यासाठी आणि विविध मागण्यांसाठी विविध संघटनांच्या वतीने दि. ८ मार्च २०२२ रोजी सकाळी १० वा. आंबेडकर चौक, अकलूज ते प्रांताधिकारी कार्यालय अकलूज असा मोर्चा काढण्यात येणार आहे.
सदर निवेदनाच्या प्रती उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलीस स्टेशन अकलूज, तहसीलदार माळशिरस यांच्यासह अनेकांना दिलेल्या आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng