महाविकास आघाडी सरकारकडून आश्वासनाची पूर्तता
मुंबई (बारामती झटका)
मराठा आरक्षण आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपये देण्याच्या आश्वासनाची महाविकास आघाडीने पूर्तता केली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ३४ कुटुंबीयांसाठी प्रत्येकी १० लाखांची मदत देण्यात येणार असून ही मदत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे वितरित करण्यात आली आहे.
मराठा आरक्षणात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १० लाख रुपये देण्याची घोषणा मागील सरकारच्या काळात करण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात केवळ १५ कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्यात आले होते. मागील सरकारचे हे आश्वासन महाविकास आघाडी सरकार पूर्ण करेल व या कुटुंबियांना राज्य शासनाकडून प्रत्येकी १० लाख रुपये देण्यात येतील, असा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मराठा समन्वयकांना दिला होता.
आता मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना वर्ग करण्यात आला आहे. शासनाची मदत न मिळालेल्या १९ वारसांना प्रत्येकी १० लाख तर यापूर्वी ५ लाख रुपये मिळालेल्या १५ वारसांना प्रत्येकी आणखी ५ लाख रुपये या निधीतून दिले जातील. औरंगाबाद जिल्ह्यातील ६, जालना ३, बीड ११, उस्मानाबाद २, नांदेड २, लातूर ४, पुणे ३ तर अहमदनगर, सोलापूर, परभणी जिल्ह्यातील प्रत्येकी एका कुटुंबाचा त्यात समावेश आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng