श्रीपूर (बारामती झटका)
महाळुंग श्रीपूर नगरपंचायतसाठी प्रभागरचना व आरक्षण सोडत निघाल्याने या भागातील इच्छुक कार्यकर्ते उत्साहाने तयारीला लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे. मात्र, प्रभागरचना आडवी, तिरकी, समांतर पध्दतीने करण्यात आल्याने बहुतांश कार्यकर्त्यांची निराशा झाली आहे. आपले हक्काचे व खात्रीचे मतदार अशी आशा बाळगलेल्या कार्यकर्त्यांची यावेळी अडचण झाल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी महाळुंग येथे आरक्षण सोडत काढण्यात आली. सर्वच पक्षांचे जबाबदार नेते, कार्यकर्ते तसेच तसेच सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ. विश्वनाथ वडजे, उपविभागीय अधिकारी विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत सोडत काढण्यात आली. एकुण सतरा प्रभाग आहेत. पहिल्याच नगरपंचायतची पहिलीच सार्वत्रिक निवडणूक होणार आहे, यासाठी या भागातील अनेक उत्साही तरुण कार्यकर्ते, काही नेते निवडणूक लढवण्यास तयार आहेत. सदर निवडणूक ही पक्षीय पातळीवर होणार असल्याने भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, आरपीआय यांच्यात तुल्यबळ लढत होऊ शकते. माळशिरस तालुक्यातील मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली व माढा तालुक्यातील आमदार बबनराव शिंदे या दोन नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली लढती चुरशीच्या होऊ शकतात. शासकीय थकबाकी, दाखले, जात पडताळणी दाखले काढण्यासाठी कार्यकर्ते आपसांत चर्चा करत आहेत. काही कार्यकर्ते अपक्ष निवडणूक लढण्यास तयार आहेत आपापल्या प्रभागात आपल्या लोकांना भेटून चाचपणी करत आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng