वेळापूर ( बारामती झटका )
वेळापूर ता. माळशिरस येथील वेळापूर अकलूज रोडवरील सुमित्रानगर या ठिकाणी मन्सूर शेख यांचे बांधकाम सुरू आहे. सदर बांधकामाची उलट सुलट चर्चा सुरू असून स्थानिक नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे.
मन्सूर शेख यांचे मूळ गाव हैदराबाद आहे. गेली अनेक वर्षापासून वेळापूर येथे फरशी बसवण्याचे काम करीत आहेत. त्यांनी चांगला व्यवसाय करून आपले आर्थिक उत्पन्न वाढवलेले आहे. वेळापूरमध्ये दोन-तीन ठिकाणी जागा घेतलेल्या आहेत. त्यांनी सुमित्रानगर येथे बांधकाम सुरू केलेले आहे. बांधकामाची रचना बंगला अथवा वाडा अशी वाटत नाही. सदरचे सुरू असलेले बांधकाम मदरसा मज्जित असावी, असा स्थानिक नागरिकांचा बांधकामावरून संशय वाढलेला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक यांनी ग्रामपंचायत पोलीस स्टेशन येथे सदर बांधकामाविषयी तक्रारी केल्या आहेत. बांधकाम करण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध नाही मात्र, लोकवस्ती असलेल्या ठिकाणी मदरसा मज्जित होऊ नये, यासाठी नागरिक संभ्रमात आहेत.

काही नागरिक न्यायालयामध्ये सदर बांधकामाविषयी तक्रार करण्याच्या मानसिकतेत आहेत. वेळापूर पोलीस स्टेशन येथे सदर बांधकामाची तक्रार गेल्यानंतर बांधकामाचे मालक मन्सूर शेख यांनी मदरसा मज्जित नसल्याचे लिहून दिलेले आहे. तरीसुद्धा स्थानिक नागरिकांचा संभ्रम दूर झालेला नाही. कारण, सदरचे बांधकाम पाहिल्यानंतर भलामोठा एकच हॉल आहे, किचन, बाथरूम, टॉयलेट असे काहीच बांधकामामध्ये दिसून येत नाही. त्यासाठी सदरच्या बांधकामाचा उपयोग फक्त राहण्यासाठी केला जाईल, असे न्यायालयात अथवा करारनामा करावा, अशी स्थानिक नागरिकांची इच्छा आहे. समाजामध्ये मन्सूर शेख हे गावी जाणार आहेत, आपली आठवण वेळापूरच्या लोकांना व्हावी, यासाठी मदरसा मज्जित बांधणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे सदरच्या बांधकामाविषयी स्थानिक नागरिक संभ्रमावस्थेत आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng