मुंबई (बारामती झटका)
निती आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारकडुन FRP अर्थात ऊसदर हा तीन टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला जात आहे. यामुळे राज्यातील सर्वसामान्य शेतकरी अडचणीत येणार आहे व येणाऱ्या काळात शेतकरीपुत्रांचे भविष्य देखील अंधकारमय होणार आहे. व्यापार धार्जिणे निर्णय घेणाऱ्या या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ? ही विचारण्याची आता वेळ आली आहे. यासाठी स्वाभिमानीने मोठा लढा उभारला असुन याआधीच दि. 12 सप्टेंबरपासुन मिस्डकॉल मोहिम देखील संघटनेकडून चालवली जात आहे. या मोहिमेस शेतकरी व राज्यातील शेतकऱ्यांची तरूण मुलं यांच्याकडुन प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे.
आता याच लढाईचा आणखी एक भाग म्हणून स्वाभिमानीचे मा. खासदार राजु शेट्टी यांच्या आदेशानुसार उद्या दि. 25 सप्टेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सायंकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्व सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर #एकरकमी_FRP या हॅशटॅगचा ट्रेंड घेतला जाणार आहे. या मोहिमेत राज्यातील सर्व राजकीय तसेच बिगर राजकीय संघटना यांनी या हॅशटॅग मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे राज्य प्रवक्ते रणजित बागल यांनी केले आहे.
स्वाभिमानी व इतर कृषीविषयक संघटनांकडून आयोजित या केलेल्या या ट्रेंडमध्ये राज्यातील शेतकरीपुत्रांनी मोठ्या संख्येने सहभागी होवुन फेसबुक, ट्विटर तसेच इतर सर्व सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर #एकरकमी_FRP हा हॅशटॅग वापरून जास्तीत जास्त प्रमाणात आपली मते मांडावीत व या मोहिमेत सहभागी होत स्वाभिमानीच्या एकरकमी FRP च्या तुकडीकरणाविरोधातील मोहिमेस बळ द्यावे, असे देखील बागल यावेळी बोलताना म्हणाले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng