सदाशिवनगर येथील गावठाणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, ग्रामस्थांची आक्रमक भूमिका प्रशासनाने वेळीच दखल घ्यावी.
सदाशिवनगर ( बारामती झटका )
सदाशिवनगर ता. माळशिरस येथील अनेक दिवसाचा घोंगडे भिजत पकडलेला गावठाणाचा प्रश्न सोडवावा, अन्यथा आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत मतदानावर बहिष्कार घालण्यासाठी जनजागृती करणार असल्याचे युवा नेते ऋषिकेश बनसोडे यांनी सांगितले.
सदाशिवनगर येथे श्री शंकर सहकारी साखर कारखाना व शेती महामंडळ जमिनी असल्यामुळे अनेक लोक उद्योग व्यवसाय नोकरी व कामधंदा यासाठी मोलमजुरी व रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. अशा लोकांना गावठाण राहण्याकरता असणे गरजेचे आहे. यासाठी अनेक दिवस झाले अनेक नेते संघटना, पदाधिकारी गावठाणासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र, गावठाणाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला राहण्यासाठी जागा नाही. त्यामुळे घर बांधता येत नाही, अनेकांचे संसार उघड्यावर आहेत. प्रशासनाने दखल घेऊन गोरगरिबांच्या हक्काच्या राहण्याच्या जागेसाठी गावठाण मंजूर करणे गरजेचे आहे.
सदाशिवनगर परिसरात शासनाची मुबलक जागा आहे, त्या जागेमध्ये गावठाण मंजूर करून गोरगरीब सर्वसामान्य जनतेचा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. प्रशासनाने गावठाणाचा प्रश्न लवकर सोडवला नाही तर, आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार घालण्याकरता जनजागृती करणार असल्याचे युवा नेते ऋषिकेश बनसोडे यांनी बारामती झटक्याशी बोलताना सांगितले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng