स्वभांडवलावर पतसंस्था कर्जदारांना कर्ज देऊ शकते अशी आर्थिक स्थिती भक्कम आहे – चेअरमन रंजनभाऊ गिरमे

माळीनगर येथील महात्मा फुले ग्रामीण बिगर शेती संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत व उत्साही वातावरणात पार पडली

माळीनगर ( बारामती झटका)

येथील महात्मा फुले ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था माळीनगर या संस्थेची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभासदांना १५ टक्के लाभांश (डिव्हीडंड) देण्यात येणार असल्याचे संस्थेचे चेअरमन राजेंद्र गिरमे यांनी यावेळी जाहीर केले.

बुधवार दि. १४ सप्टेंबर रोजी सौभाग्य मंगल कार्यालय माळीनगर येथे या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी माळीनगर साखर कारखान्याचे होलटाईम डायरेक्टर सतीश गिरमे हे होते. प्रारंभी क्रांतीसुर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र गिरमे, व्हा. चेअरमन महादेवराव एकतपुरे, संचालक किरण गिरमे, चंद्रकांत जगताप, निळकंठ भोंगळे, कृष्णा भजनावळे, सुरज वाघमोडे, शुगरकेनचे चेअरमन अमोल ताम्हाणे, राहुल गिरमे, विजय नेवसे, मिलिंद गिरमे, किरण गिरमे, सुरेश राऊत, सुरेश गिरमे आदी सभासद उपस्थित होते.

यावेळी पतसंस्थेचे सचिव योगेश कचरे यांनी सभेपुढील विषय तसेच ताळेबंदाचा आढावा घेतला. यामध्ये पतसंस्थेची स्थापना १९९४ साली झाली असून भाग भांडवल १ कोटी २ लाख एवढे आहे. संस्थेत १६ कोटी ८४ लाख रुपये ठेवी असून खेळते भांडवल ३० कोटी ९१ लाख आहे. संस्थेची वार्षिक उलाढाल १२४ कोटी १५ लाख असून कर्ज वसुली ११८.८६ टक्के एवढी आहे. संस्थेचा तरतूदपूर्व नफा १ कोटी ५७ लाख व निव्वळ नफा ५२ लाख ६९ हजार एवढा असून संस्थेला ‘अ’ ऑडिट वर्ग मिळाला असल्याचे सांगितले.

यावेळी चेअरमन राजेंद्र गिरमे म्हणाले, महात्मा फुले पतसंस्थेतील ठेवीदारांनी संस्थेत ठेवलेल्या सर्व ठेवी जरी काढून घेतल्या तरी संस्था ही स्वभांडवलावर कर्जदारांना कर्ज वाटप करू शकते, एवढी आर्थिकदृष्ट्या संस्था भक्कम झालेली आहे. संस्थेने कर्जदारांना दिलेले कर्ज बाकी आणि थकबाकीची वसूली ही ११८ टक्के पेक्षा जास्त प्रमाणात यावर्षी झालेली आहे. अनेकांच्या गरजा भागवण्यासाठी तसेच व्यवसायिकांना व्यवसायासाठी मदत केल्याशिवाय आणि इतर कर्जे दिल्याशिवाय पतपेढ्या चालणारही नाहीत. त्यामुळे संस्थेने आता कर्ज वाटप करताना बरेचशी बंधने घातल्यामुळे कर्ज वसुली सुध्दा चांगली होवू लागली आहे, असे श्री. गिरमे म्हणाले.

सभा यशस्वी करण्यासाठी सचिव योगेश कचरे, हामीद कोरबू, ज्ञानेश्वर व्यवहारे, विश्वराज बनकर, युवराज कापले, कृष्णा घाडगे, सनी भुजबळ यांनी परिश्रम घेतले. यावेळी संचालक सूरज वाघमोडे यांनी स्वागत केले तर शेवटी व्हा.चेअरमन महादेव एकतपुरे यांनी आभार मानले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleबोरगाव येथील विविध विकास कामांची चौकशी करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा आम आदमी पार्टीचा गटविकास अधिकारी यांना इशारा.
Next articleग्रामविकास मंत्री ना. गिरीशजी महाजन व पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोंढा यांच्याकडे मतदार संघातील विकास कामांना निधीची मागणी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here