कौशल्य विकसित करा, बेरोजगारी नष्ट होईल – सौ. शितलदेवी मोहिते पाटील
अकलूज ( बारामती झटका )
बेरोजगारी वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपणाकडे असलेल्या कौशल्याचा अभाव. आपल्याकडे मनुष्यबळ प्रचंड आहे. पण या मनुष्यबळाकडे पुरेसे कौशल्य नाही. कौशल्य नाही म्हणून काम नाही. तुम्ही जर कष्टाने स्वतःमध्ये एखादे कौशल्य विकसीत केले तर तुमचे हात कधीही कामापासून वंचित राहणार नसल्याचे प्रतिपादन सौ. शितलदेवी मोहिते-पाटील यांनी केले.
आ. रणजितसिंह मोहिते पाटील व भाजपचे संघटनमंत्री धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवरत्न शिक्षण संस्था व शिवपार्वती सार्वजनीक विकास व सेवा ट्रस्ट यांचे वतीने आयोजित भव्य रोजगार मेळाव्याचा शुभारंभ धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला..
यावेळी सचिव धर्मराज दगडे, संचालक डाॅ. विश्वनाथ आवड, विविध कंपन्यांचे प्रतिनिधी यांच्यासह शिवरत्न शिक्षण संस्था व शिवपार्वती शिक्षण संस्थेचे सर्व संचालक व हजारो विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी शितलदेवी मोहिते-पाटील म्हणाल्या, सध्या अनेक तरुण बेरोजगार आहेत, बेरोजगारी वाढत असल्याचे सांगत असलो तरी मात्र, दुसऱ्या बाजूला कंपन्यांकडे कौशल्याधारीत मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यांची चांगल्या मनुष्यबळाची गरज संपलेली नाही. त्यामुळे नोकरी इच्छुकांनी आपल्यातली हुशारी, कसब आणि मेहनत करण्याची तयारी दर्शवावी म्हणजे नोकरी सहज उपलब्ध होईल. असे सांगत ग्रामीण भागातील विद्यार्थी हुशार आणि होतकरू असल्याने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची आज निवड होईल, अशी आशा व्यक्त केली.
प्रास्ताविकात प्रा. संजय साळुंखे यांनी रोजगार मेळावा आयोजनाचा उद्देश स्पष्ट करत या रोजगार मेळाव्यास सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांकडून व राज्यभरातील कंपन्यांकडून चांगला प्रतिसाद मिळालेला असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेहंदी थोरात यांनी केले तर प्रा. रंजना कांबळे यांनी आभार मानले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng