अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती आषाढी वारीतील व्यापारी, उद्योजक व भाविकांची आर्थिक पिळवणूक थांबवतील का ?

पणन मंत्री नामदार जयकुमार रावल व पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी लक्ष देण्याची गरज पीडित जनतेतून मागणी होतेय…
नातेपुते (बारामती झटका)
आषाढी वारीसाठी महाराष्ट्रातून श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज यांच्यासह हजारो पालख्यांचे आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे वेगवेगळ्या मार्गाने पालख्यांची पायी वारी सुरू असते. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळा आळंदीवरून पुणे, सातारा, जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात धर्मपुरी ग्रामपंचायत हद्दीत प्रवेश करून पहिला मुक्काम नातेपुते नगरपंचायत हद्दीमध्ये असतो. नातेपुते नगरीमध्ये अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीची नातेपुते येथे दुय्यम बाजार समिती आहे. सदरच्या दुय्यम बाजार समितीच्या मोकळ्या जागेमध्ये आषाढी वारीनिमित्त व्यापारी, उद्योजक आपला व्यवसाय उभा करीत असतात. अशावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून व्यापारी व उद्योजक यांना नाममात्र पावती देऊन त्यांच्याकडे बेकायदेशीर वाढीव आर्थिक व्यवहार केला जातो, अशी चर्चा दरवर्षी सुरू असते. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 200 रुपयांच्या पावतीला 25 हजार रुपये घेतलेले होते. अँटिकरप्शन यांनी सदरच्या इसमावर गुन्हा सुद्धा नोंद केलेला होता. यामुळे बाजार समिती अशा पद्धतीने बेकायदेशीर कृत्य करीत असल्याचा प्रत्यय आलेला आहे. व्यापारी व उद्योजक यांच्याकडून ज्यादा आर्थिक रसद घेतल्याने त्यांचा ताण भाविकांच्या आनंदावर येतो त्यामुळे अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आषाढी वारीतील व्यापारी, उद्योजक व भाविकांची आर्थिक पिळवणूक थांबवतील का ?, याकडे महाराष्ट्र राज्याचे पणन मंत्री नामदार जयकुमार रावल व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी लक्ष घालावे, अशी मागणी पीडित जनता व भाविकांमधून होतेय.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा पहिला मुक्काम माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात नातेपुते नगरीमध्ये असतो. नातेपुते शहर उद्योग, व्यवसायिक, व्यापार या दृष्टीने माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात सर्व परिचित आहे. नातेपुते शहराला आसपासच्या तीस ते पस्तीस गावातील दैनंदिन व्यवहारासाठी संपर्क येत असतो. त्यामुळे नातेपुते शहरात कायमच आसपासच्या लोकांची वर्दळ असते. नातेपुते शहरामध्ये माऊलींच्या पालखीचा उत्सव सोडून कोणताच मोठा उत्सव नसतो. त्यामुळे ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या आगमनाची वाट नातेपुतेकरांसह आसपासच्या तीस ते पस्तीस गावातील भाविकभक्त पाहत असतात. अशावेळी छोटे-मोठे उद्योग, व्यवसाय करणारे, मोठे पाळणे, गोल तिरपे फिरणारे, खेळणी साहित्य, असे व्यावसायिक अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नातेपुते दुय्यम बाजार समितीच्या आवारामध्ये आपले उद्योग, व्यवसाय उभा करीत असतात. बाजार समितीकडून पाळणे, खेळणी व इतर व्यवसायिक यांच्याकडून नाममात्र पावती करून त्यांच्याकडून वाढीव रक्कम घेतली जाते. त्यामुळे त्यांच्या वाढीव रकमेचा बोजा भाविक व पालखी सोहळ्याचा आनंद घेणाऱ्या भक्तांवर येवून आर्थिक ताण येत आहे. जर अशा लोकांना कमी दरामध्ये उद्योग, व्यवसाय करण्याकरता जागा उपलब्ध करून दिली तर माफक दरामध्ये येणाऱ्या भाविकांना पाळण्याचा व इतर साहित्य खरेदी करण्याचा आर्थिक ताण येणार नाही आणि खऱ्या अर्थाने माऊलीच्या पालखी सोहळ्यातील बाजार समितीच्या अनियमित आर्थिक घोटाळ्याला लगाम बसेल. यासाठी पणन मंत्री नामदार जयकुमार रावल व पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी लक्ष घालावे, अशी पीडित जनतेकडून मागणी होत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.