आत्महत्या करणे म्हणजे माणसाने सुखी जीवनाकडे फिरवलेली पाठ आहे – किशोरसिंह माने पाटील.

युवकांनी मनावर संयम ठेवून धैर्याने वागावे, असा मैलीक सल्ला हि त्यांनी दिला.
अकलूज (बारामती झटका)
देवाने माणसाला एकदाच जन्म दिला आहे. तो सुख, समाधान व जीवनातील आनंद घेण्यासाठी दिला आहे. पण, आजकाल तरूण वर्ग विविध व्यसनाच्या आहारी जाऊन टेन्शन घेऊन जीवन जगत आहेत. यातून ते शेवटी आत्महत्येचा मार्ग अवलंबतात. अशी प्रतिक्रिया अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच किशोरसिंह माने पाटील यांनी व्यक्त केली आहे.
अकलूज परिसरात गेल्या दोन वर्षांपासून तरूण पिढी आत्महत्येचा मार्ग अवलंबत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आजचा युवक उद्याचा देश घडविणारा नागरिक आहे. पण, तरूणपणातच हा युवक व्यसनाच्या आहारी व खाजगी सावकारांच्या व्याजाचे टेन्शन घेऊन पुढचा व मागचा विचार न करता आपल्या जीवनयात्रेचा प्रवास आत्महत्या करून संपवत आहे. अशी परिस्थिती जर पुढे राहिली तर भारत देशाचे भवितव्य काय ?, असा प्रश्न निर्माण होतो. हा प्रश्न एकट्याने आत्महत्या करून सुटत नाही. तर तो सामोपचाराने घेतला पाहिजे. आज एका युवकाने आत्महत्या केली तर प्रश्न सुटत नाही. उलट त्याच्या घरातील पत्नी, मुलाबाळांना मानसिक त्रास सहन करत जीवन जगावे लागत आहे. जर त्याच्या घरात वयोवृद्ध आई वडील असतील तर त्यांना जिवंतपणी मरण यातना सहन कराव्या लागतात. आज आपल्या घरातील कर्तृत्ववान मुलगा जर आपल्या डोळ्यासमोर गेला तर त्या वयोवृद्ध बिचा-यांनी न्याय तरी कुणालाकडे मागायचा. अशी अवस्था काही घरातून दिसत आहे. त्यामुळे तरूणांनी व्यसनाच्या आहारी जाऊ नका व व्यापार करण्यासाठी व व्यवसायासाठी खाजगी सावकारांकडून व्याजाने पैसे काढून नका, असे त्यांनी तरूणांना आवाहन केले आहे. उद्या हेच खाजगी सावकार आपले मालक होतात व नंतर मोबाईलवर घरातील महिलांविषयी अश्लील भाषेत बोलतात व चारचौघात अब्रुचे धिंडोरे काढणे असे प्रकार सुरू होता.
जर अशा संकटात युवक अडकला असेल तर तो प्रश्न आपल्या परिवारासमोर मांडावा. त्या तरूणाने आपल्या मित्र मंडळींचा सल्ला घेणे. त्यातून योग्य मार्ग काढावा. तरूणांनी व्यवसाय करताना खाजगी सावकारांच्या पुढे कधीही हात पसरू नये. जेवढे आपल्याला झेपेल तेवढे सरकारी बॅंकांकडून कर्ज घ्या. पण कृपया करून आत्महत्येचा विचार करू नका, असे त्यांनी तरूणांना आवाहन केले आहे.

उगवलेला सूर्य मावळतो, हा निसर्ग नियम आहे. प्रत्येकाच्या जीवनात एक वेळ अशी येते, ती परीक्षाच असते. त्यामध्ये पास होणे गरजेचे असते. या समस्येवरून कवि मंगेश पाडगावकर यांच्या कवितेची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. “सांगा कसे जगायचे… कण्हत कण्हत की…गाणे म्हणत, तुम्हीच ठरवा…डोळे भरून तुमची आठवण… कुणी तरी काढतच ना..!
प्रत्येकाच्या जीवनात समस्या येत असतात. कुणाला कौटुंबिक, आर्थिक ,सामाजिक, वैयक्तिक समस्या असतात. समस्यांवर मात करून पुढील आनंदी जीवन जगण्याची वाटचाल करणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही समस्येवर आपले जीवन संपविणे हा काही उपाय नाही आहे. जीवन संपविल्यामुळे समस्या सुटत नाही. हे आयुष्य एकदाच आहे पुन्हा जन्म नाही आहे. आलेल्या संकटातून योग्य मार्ग काढून सुखी जीवन जगले पाहिजे.
किशोरसिंह माने-पाटील
माजी सरपंच, अकलूज ग्रामपंचायत अकलूज
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.